नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवीत या महापालिकेतील गेल्या पंधरा वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. आम आदमी पक्षाने येथे स्वबळावर बहुमत मिळवत भाजपला प्रथमच धूळ चारली आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने दोन वेळा प्रचंड बहुमत मिळवले असले तरी त्यांना आतापर्यंत दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला पराभूत करणे शक्य झाले नव्हते पण त्यांनी आज ही कामगिरी नोंदवली आहे. महापालिकेच्या 250 जागांपैकी आम आदमी पक्षाला 137 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 101 आणि कॉंग्रेस पक्षाला केवळ 9 जागा मिळू शकल्या आहेत. 3 जागा अन्य पक्ष किंवा अपक्षांना मिळाल्या आहेत.
एक्झिट पोलच्या निकालात आम आदमी पक्षाचा या महापालिकेत एकतर्फी विजय होईल आणि त्यांना पावणे दोनशेपर्यंत जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मात्र आपला तितके यश मिळू शकले नाही. भाजपने एक्झिट पोलच्या निकालापेक्षाही अधिक चांगली कामगिरी नोंदवली आहे.
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, अवघ्या 10 वर्षांच्या पक्षाने देशातील सर्वात मोठ्या पक्षाचा (भाजप) पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाने 17 केंद्रीय मंत्री व अनेक मुख्यमंत्री दिल्ली महापालिकेच्या प्रचारात उतरवले होते. तरीही येथील निवडणुकीत आम आदमी पक्षाने बहुमत मिळवल्याने हा निकाल उल्लेखनीय आहे. “आप’ हा कट्टर प्रामाणिक पक्ष असल्याचे निकालांनी या पुन्हा एकदा सिद्ध केले आहे असे त्यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाचे नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनीही हा आम आदमी पक्षाने केलेल्या उत्तम गव्हर्नन्सचा विजय असल्याचे म्हटले आहे. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता उभी राहते, लोकांना नफरतीचे राजकारण आवडत नाही असे यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे, असे ते म्हणाले.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले, की 15 वर्षांच्या सत्तेनंतर आमच्या विरोधात ऍन्टी इन्कम्बन्सी असूनही आमची कामगिरी चांगली झाली आहे. आम्ही दिल्लीतील लोकांसाठी महानगरपालिकेत चांगले काम केले, परंतु कदाचित लोक तेवढ्याने समाधानी नसतील. तरीही त्यांचा भाजपवर राग नव्हता, असे ते म्हणाले.
आजच्या मतमोजणीचे वैशिष्ट्य असे की सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पक्ष आपपेक्षा खूपच आघाडीवर असल्याचे दिसले होते. परंतु नंतर नंतर मात्र आम आदमी पक्षाला बढत मिळणे सुरू झाले आणि अंतिमत: आपने येथे स्पष्ट बहुमत मिळवले. कॉंग्रेसची या निवडणुकीतील कामगिरी मात्र निराशाजनक झाली. या पक्षाला मतदारांनी खिजगणतीतच धरले नसल्याचे यातून दिसून आले.
Parliament Winter Session : सीमा वादात केंद्राने हस्तक्षेप करावा – सुप्रिया सुळे
दरम्यान, 2017 महापालिका निवडणुकीत भाजपने तत्कालीन 270 नगरपालिका वॉर्डांपैकी 181 वॉर्ड जिंकले होते, तर आम आदमी पक्षाला फक्त 48 जागा मिळाल्या होत्या. 30 जागा मिळवून कॉंग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला होता.