शिरूरमधील व्यापाऱ्याला नगर-सोलापूर रोडवर दिवसाढवळया लुटले; सोन्याच्या दागिन्यांसह, कॅश व रिव्हॉल्वरही नेले लुटून

शिरूर – शिरूरमधील गोळया बिस्कीटांचे होलसेल व्यापारी निखिल अच्छा व त्यांच्या सोबत प्रवास करणारे व्यापारी मित्र अरुण कानडे हे नगर -सोलापूर महामार्गावर प्रवास करत असताना वाटेफळ गावच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबले असता टु व्हिलर वरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी काठीने मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिणे, कॅश व लायसन्स धारक रिव्हॉल्वर असा २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. १६ जुलै रोजी ११ वाजताच्या सुमारास निखिल अच्छा व त्यांचा मित्र अरुण मधुकर कानडे हे किरण परदेशी यांची एक्सप्रेसो गाडी नं MH 12 WK 7496 मध्ये शिरूरवरुन अहमदनगर येथे चॉकलेट गोळ्यांचा माल आणण्यासाठी तसेच त्यांच्या राशिन, कर्जत येथील प्रॉपर्टीचा व्यवहार करण्यासाठी ते शिरुर येथुन निघाले होते.
केडगाव येथे आदित्य श्रीमाळ यांना भेटुन त्यांना धंद्याचे व्यवहाराचे पैसे देवुन पुढे दुपारी ३ वा .चे सुमारास राशिन येथे जाणेसाठी ते निघाले. राशिनकडे जात असताना नगर सोलापुर रोडवरील वाटेफळ गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला ०४ वा. च्या सुमारास त्यांनी गाडी थांबवून लघुशंकेसाठी ते खाली उतरले.
गाडीचे खाली उतरताच समोरच्या बाजुने रुईछत्तीशीच्या दिशेकडुन राँग साईडने एक पॅशन व दूसरी सीडी १०० दु चाकीवर प्रत्येकी दोन ईसम असे चारजण त्यांच्या जवळ आले. तसेच त्यांचा पाठीमागुन दुचाकीवर एक ईसम आला. असे पाच अनोळखी ईसम त्यांच्याजवळ येऊन थांबले. पाठीमागुन आलेल्या ईसमाने निखिल अच्छा यांच्या डाव्या डोळ्याखाली बुक्की मारली व कॉलर पकडली त्याचवेळेस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून आणखी चार ईसम आले.
त्यांच्या हातामध्ये प्रत्येकाकडे काठ्या होत्या. त्यांनी दोघांनाही काठीने मारहाण केली व ते सर्वजण तुमच्याकडे काय माल आहे तो काढुन द्या नाहीतर आम्ही तुम्हाला मारुन टाकु असे म्हणुन त्यांच्या सोबत झटापट करु लागले. त्यातील काही ईसमांनी निखिलच्या हातातील सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, कानातील एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी, मोबाईल, 49 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे व रोख रक्कम 14,000/- रुपये बळजबरीने काढुन घेतले.
तसेच निखिलचा मित्र अरुण याच्या खिशातील 84,000/-रुपये व मोबाईल बळजबरीने काढुन घेतले. निखिलला थोडी मोकळीक भेटताच त्याच्या कमरेला लावलेला रिव्हॉल्वर काढला असता त्यातील एका ईसमाने लगेच त्याचा हात पकडुन रिव्हॉल्वर हिसकावुन घेवुन सर्व ईसम दुचाकी गाड्यांवर बसुन रुईछत्तीशीच्या दिशेने पळुन गेले. दोघेही खुप घाबरले होते.
दोघे गाडीत बसुन जिव वाचवुन ते लोक परत येतील या भितीने नगरच्या दिशेने शिरुर पोलिस स्टेशनला गेले. शिरुर पोलिस स्टेशन येथे जाऊन तेथे त्यांच्याबरोबर झालेला प्रकार सांगितला. शिरुर पोलिसांनी नगर तालुका पोलिस स्टेशन येथे संपर्क करुन त्यांच्या सोबत वाटेफळ येथे घटना झालेल्या ठिकाणी घेवुन गेले. तेथे नगर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी देखील दाखल झाले. त्यांनी घटना ठिकाणची पाहणी केली व घटनेची चौकशी केली.
घटनेच्या वेळीत्यांच्या पाठीमागुन जी दुचाकी आली होती ती कोणती होती हे त्यांनी पाहीले नाही. ईसम आलेल्या तीनही दुचाकींना नंबर प्लेट नव्हत्या, सदर ईसम हे कोण होते ते त्यांना माहीत नाही. त्यांनी तोंडाला रुमाल व मास्क लावलेले होते. दोन जणांचे चेहरे उघडे होते . ९ अज्ञात चोरट्यांनी दोघांना काठीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देवुन सोन्याचांदीचे दागिणे, कॅश रिव्हॉल्वर लुटून नेल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नगर तालुका पोलिस स्टेशन करत आहे.





