मुंबई : राज्यात १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी एकूण १५,९३१ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. एकूण ३३,२४७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यापैकी छाननीनंतर २४,७७१ अर्ज वैध ठरले. वैध ठरलेल्यांपैकी ८,८४० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या २९ महानगरपालिकांमधील ८९३ प्रभागांमधील २८६९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. २२७ जागा असलेल्या मुंबई वगळता, उर्वरित सर्व बहुसदस्यीय प्रभाग आहेत. मुंबईत २,५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २,१५३ अर्ज वैध ठरले आहेत. ४५३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता १,७०० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील २९ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुणे महानगरपालिकेत सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. दाखल झालेल्या ३,०६१ अर्जांपैकी २,१३४ अर्ज वैध ठरले, तर ९६८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे राज्यतील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी १,१६६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ३८ प्रभाग आणि १५१ जागा असलेल्या नागपूर महानगरपालिकेत १,४४२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १,२९३ अर्ज वैध ठरले. आयोगाच्या माहितीनुसार, ३०० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर शहरात ९९३ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये ६६१, सोलापूरमध्ये ५३२, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५५२, ठाण्यात २६३ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ४४३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८५९, नाशिकमध्ये ७३५, ठाण्यात ६५६ आणि नवी मुंबईत ४९९ उमेदवार रिंगणात आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या मते, अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यामुळे छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ज्यामुळे मतदानासाठी आणि दुसऱ्या दिवशी होणार्या मतमोजणीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.