Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का! ‘या’ दोन निकटवर्तीयांनी सोडली साथ; दादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे कारणही सांगितले म्हणाले…

ठाणेः मंगळवारी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दोन खंद्या समर्थकांनी त्यांची साथ सोडत अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हा आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. आव्हाडांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे आता अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात येणारा कळवा मुंब्रा हा विधानसभा मतदार संघ शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. आव्हाड यांची साथ सोडणारे अभिजित पवार हे महापालिककेची निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यांनी आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. तर हेमंत वाणी आणि त्यांची पत्नी सीमा वाणी हे महापालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.
राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीचे दोन गट पडले. शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी या विधानसभेच्या निवडणूकीतही आव्हाड यांचे काम केले होते. या दोन्ही खंद्या समर्थकांनी आव्हाड यांची साथ सोडली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी पक्ष प्रवेश केला आहे.
अभिजित पवार काय म्हणाले?
आव्हाड कुटुंबियांच्या मी अत्यंत जवळ होतो. आव्हाड कुटुंबासोबत मी अगदी कुटुंबाप्रमाणे राहत होतो. त्यामुळे अनेक प्रकरणे मी अंगावर घेतली होती. आता मी मोकळा श्वास घेत आहे. व्यवस्थित झोपू शकतो, अशी प्रतिक्रिया अभिजीत पवार यांनी पक्ष प्रवेशानंतर माध्यमांना दिली. तसेच प्रभागात निधी आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हात हवा असतो. त्यामुळे हा प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.
हेमंत वाणी काय म्हणाले?
प्रभागात कामे करायची आहे. नागरिकांची समस्यांतून सुटका करायची आहे. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे अभिजीत पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रभागात लोकांची कामे करण्यासाठी मी पक्ष सोडल्याचे हेमंत वाणी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले.





