आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव सोहळा; भाविकांसाठी देवस्थान-ग्रामस्थांचे उत्कृष्ट व्यवस्थापन

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आळंदीत सुरू असलेल्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवात हजारो भाविकांचा उत्साह शिगेला आहे. चौथ्या दिवशी (६ मे ) देखील भाविकांचा प्रचंड ओघ आळंदीत दिसून आला. या सर्वांसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी ग्रामस्थांनी निवास, भोजन, दर्शन आणि स्वच्छतेची उत्तम व्यवस्था केली आहे. स्वयंसेवकांच्या चोखंदळ नियोजनामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय न होता महोत्सवाचा आनंद लुटता येत आहे.
भाविकांसाठी सर्वंकष सोयी –
शनिवारपासून (३ मे) सुरू झालेल्या या भव्य सोहळ्यात दूरदूरहून आलेल्या भाविकांसाठी संस्थान आणि ग्रामस्थांनी नियोजनबद्ध काम केले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि दर्शन व्यवस्था उत्कृष्ट व्यवस्था आहे. भाविकांसाठी माहिती आणि मदतकेंद्रे स्थापन करण्यात आली असून, येथे आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध आहे. या व्यवस्थेमुळे भाविकांनी देवस्थान आणि ग्रामस्थांचे तोंडभरून कौतुक केले.
आजचे कार्यक्रम –
चौथ्या दिवसाच्या कार्यक्रमांत सकाळी ६ ते १० या वेळेत ह.भ.प. एकनाथ महाराज कोष्टी यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वरी पारायण झाले. याशिवाय, ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे यांचे कीर्तन, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र चिंतन, ह.भ.प. रामकृष्णदास लहावितकर यांचे प्रवचन झाले असून सायंकाळी ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन आणि परमेश्वर महाराज जायभाय, पंढरीनाथ महाराज आरू, महेश महाराज भगुरे, ज्ञानेश्वर महाराज मेश्राम या नामवंत गायकांचे वारकरी सांप्रदायिक भजन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. ज्ञानेश्वरी पारायणादरम्यान गुरुभक्तीच्या ओवींनी उपस्थितांना अंतर्मुख केले.
संस्थान-ग्रामस्थांची एकजुट –
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे हा महोत्सव आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. “भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, हाच आमचा उद्देश आहे. सर्वांनी मिळून केलेल्या नियोजनामुळे हा सोहळा यशस्वी होत आहे,” असे संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी सांगितले. ग्रामस्थांनीही स्वयंसेवक म्हणून रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.
आळंदी भक्तिमय –
हा महोत्सव 10 मे पर्यंत चालणार असून, कीर्तन, प्रवचन, भजन आणि पारायण यांनी आळंदीचा परिसर भक्तिमय झाला आहे. भाविकांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन या सोहळ्याचा आनंद लुटला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणींचा प्रसार आणि भक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा महोत्सव मैलाचा टप्पा ठरत आहे.





