पाचवी, आठवीच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर; शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रतिक्रिया

पुणे -पाचवी आणि आठवीच्या परीक्षा घेतल्याने गुणवत्तेत भर पडणार असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सरसकट पास करण्याबाबतचे धोरण राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केले आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असून आता इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल व गुणवत्तेत भर पडून सुधारणेस मोठा हातभार लागणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. आता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्यात आली आहे. या वर्गात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुनर्परीक्षेत संधी देवूनही तो अनुतीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
इयत्ता पाचवी व आठवी हे महत्वाचे टप्पे आहेत. त्यामुळे पडताळणीच्या दृष्टीने वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले.
इयत्ता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय स्वागतार्ह आहे. यातून विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची गोडी निर्माण होऊन गुणवत्तेचा स्तर उचांवण्यास मदतच होणार आहे, असे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे समन्वयक शिवाजी खांडेकर म्हणाले.
राज्य शासनाकडून केवळ धोरण जाहीर करुन चालणार नाही. त्या धोरणाची सक्षमपणे अंमलवजावणी व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे सातत्याने मूल्यमापन झाले पाहिजे, असे आप पालक युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत म्हणाले.
इयत्ता पाचवी व आठवीसाठी परीक्षाच होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत भीती नव्हती. परीक्षा होणार असल्याने शिक्षकांबरोबर पालकही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष देतील, असे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. अविनाश ताकवले म्हणाले.
विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, विषयाचे ज्ञान आणि मूलभूत संकल्पना समजण्यादृष्टीने परीक्षा घेण्याचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे मुले अभ्यासाकडे वळतील आणि त्याचे गांभीर्यही पालकांना येईल. अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुन्हा परीक्षेची संधी आहे, असे आपटे प्रशालेचे शिक्षक समुपदेशक भगवान पांडेकर म्हणाले.
हुशार मुले उठून दिसतात. मात्र, अभ्यासात मागे असलेल्या मुलांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यात मुलांना काय अडचणी आहेत, त्यादृष्टीने सुधारणा करता येऊ शकते, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरूद्ध देशपांडे म्हणाले.
शिक्षकांच्या कार्याला अधिक प्रेरित करणारा निर्णय आहे. आता शिक्षकांपुढे समोर उद्दिष्ट असल्याने आणखी जाणीवपूर्वक काम होईल, असे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे म्हणाले.





