मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारतर्फे 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. यंदाचे हे अधिवेशन नाशिक येथे होणार आहे. जयंत नारळीकर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष असून त्यासाठी प्रथेनुसार मुख्यमंत्र्यांनी ही मदत जाहीर केली आहे.
प्रस्तावित अधिवेशन हे करोनाच्या संबंधातील सर्व नियमांचे पालन करून साजरे केले जावे अशी अपेक्षाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली ही सरकारी मदत लवकरच संमेलनाच्या संयोजकांकडे सुपुर्त केली जाणार आहे.
सरकारच्या निधीमुळे संमेलनाच्या खर्चाला मोठी मदत होत असते. बाकीचा निधी अन्य प्रायोजक आणि देणगीदात्यांकडून गोळा केला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत असले तरी तेथे त्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घेण्याची सूचनाही सरकारकडून संयोजकांना करण्यात आली आहे.