Accident News: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे वळणावर आज सकाळी काळाने भीषण झडप घातली. विठ्ठलवाडी आगाराची एसटी बस आणि स्कॉर्पिओ कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये स्कॉर्पिओमधील प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. विठ्ठलवाडी आगारातून सकाळी साडेआठ वाजता ‘विठ्ठलवाडी-कल्याण-अहिल्यानगर’ ही एसटी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. मुरबाड तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे हद्दीतील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ कारची बसला जोरदार धडक बसली. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ४ जणांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश – ही धडक इतकी वेगवान होती की, दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातातील मृतांचा आकडा ४ असून, जखमी झालेल्या ४ जणांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले – अपघातानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. वळणावरील ओव्हरटेकिंग ठरले जीवघेणे – माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वैशाखरे परिसरातील वळणे अत्यंत धोकादायक मानली जातात. आजचा अपघातही ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, महामार्गावरील शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.