पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालातील गुणपडताळणीसाठी 6 दिवसांत 350 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
राज्यात 24 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल गुरुवारी (दि.16) जाहीर झाला आहे. या अंतरिम निकालातील गुणपडताळणी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉनिंगमधून ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी येत्या 27 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी 50 रुपये शुल्कही ऑनलाइन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम यात दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आत्तापर्यंत बहुसंख्य विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणीसाठीच अर्ज दाखल झाले आहेत. यातील 100 अर्जांच्या गुणपडताळणीची तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांच्या गुणांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्ती विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. ऑनलाइन व्यतिरिक्त व मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. मुदतीत गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर येत्या 15 जूनपर्यंत अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.