नवी दिल्ली – विरोधी पक्षांच्या 19 खासदारांना मंगळवारी आठवड्याभरासाठी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे 7 आणि द्रमुकच्या 6 खासदारांचा समावेश आहे. पावसाळी अधिवेशनाला 18 जुलैला सुरुवात झाल्यापासून वाढती भाववाढ आणि दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंवर लावण्यात आलेल्या जीएसटीच्या मुद्द्यावरून संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा आणल्याबद्दल या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
अध्यक्षाच्या समोरील मोकळ्या भागात एकत्र आलेल्या खासदारांनी आपल्या जागेवर परत जाण्याबद्दल उपाध्यक्ष हरिवंश यांनी वारंवार केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी 10 खासदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र हरिवंश यांनी निलंबित केलेल्या 19 खासदारांची नावे वाचून दाखवली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा करोनाची लागण
यामध्ये तृणमूलचे 7, द्रमुकचे 6, तेलंगण राष्ट्र समितीचे 3, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे 2 आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या एका खासदाराचा समावेश आहे. सभागृहाबद्दल आणि पीठासीन अधिकाऱ्यांबद्दल अनादर दाखवल्याबद्दल या खासदारांना निलंबित करण्यात येत असल्याचे हरिवंश यांनी म्हटले आहे. या खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर या खासदारांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिल्यामुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
शासनाचा महत्वपूर्ण निर्णय; प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी