10th And 12th Exam Result : यंदा दहावी व बारावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा दिवस अगोदर सुरू होत आहे. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षांचा निकालही १५ मेपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बारावीचा निकाल साधारण १० मेपर्यंत, तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेता, राज्य मंडळाने दोन्ही परीक्षा लवकर घेण्यासोबतच त्यांचे निकाल जलद जाहीर करण्याची भूमिका स्वीकारली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत. परीक्षांनंतर आता मुलांचे निकाल कधी लागणार? याचे पालकांना वेध लागले होते. मात्र, आता पालकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही लवकरच पालकांचे टेन्शन कमी होणार आहे. शिक्षण विभाग दररोज तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा घेत आहे. त्यामुळे परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाला बद्दल शिक्षणमंत्री काय म्हणाले होते? एकदा पाहा…. शिक्षण विभागाच्या अखत्यारितील विषयांचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे काही दिवसांपूर्वीच पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्य मंडळाच्या कार्यालयात त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार. फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी केली. यंदा परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर आल्या आहेत. परिणामी त्यामुळे राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचा निकाल यंदा १५ मेपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले होते. यापूर्वी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात जाहीर केली जात असे. परंतु, गेल्या काही वर्षांत बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात आहे. यावर्षी त्यापेक्षा लवकरच निकाल जाहीर होतील, असेही भुसे म्हणाले होते.