Rajnath Singh : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवाद्यांना कंठस्नान; राजनाथ सिंह यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती

नवी दिल्ली : भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत दिली. तर, मल्लिकार्जुन खर्गे यांनी संपूर्ण विरोधक सरकारच्या पाठिशी ठामपणे असल्याचे सांगितले.
केंद्र सरकारने सर्व पक्षांना ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज संसदेच्या आवारात सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ठाकरेसेनेचे खासदार संजय राउत, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या (एसपी) सुप्रिया सुळे, राकॉचे प्रफुल्ल पटेल, आपचे संजय सिंह, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी उपस्थित होते.
राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराने सीमेपलीकडे राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली. यात दहशतवाद्यांची ९ ठिकाणे आणि 100 दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला तर त्याला चोख प्रत्यूत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितले की, कॉग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला आपला पाठिंबा दर्शविला आहे. गोपनियतेचे कारण सांगून काही गोष्टी आम्हाला सांगता येणार नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तरीसुध्दा, विरोधी पक्ष सरकारच्या पाठिशी आहेत, असे खर्गे म्हणाले. पंतप्रधानाच्या अनुपस्थितीवर आपण पुढे कधीतरी बोलू. मात्र, संकटाच्या या घडीत सरकारला पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी सुध्दा खर्गे यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
किरेन रिजिजू म्हणाले की, सर्वपक्षांनी भारतीय लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले. राजकीय नेत्यांनी परिपक्वता दाखवली. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचा आणि काश्मीरवासीयांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याची ही सुवर्णसंधी चालून आली आहे. पूंछ सेक्टरमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना दहशतवापिडित म्हणून जाहीर करावे आणि भरपाईसोबतच घराची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसने ‘संविधान वाचवा रॅली’सह पक्षाचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा तीन देशांचा दौरा रद्द केला आहे. ते १३ ते १७ मे दरम्यान नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणार होते.





