Gas Shortage : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. राज्यात निर्माण झालेली गॅसची भीषण टंचाई लक्षात घेता, राज्य सरकारने गॅस वितरणाबाबत नियमावली जारी केली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देत १०० टक्के पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे इतर क्षेत्रांतील गॅस पुरवठ्यावर कपात करण्यात आली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिका-यांना सुचना देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकाद्वारे निर्देश दिले की, रुग्णालये, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित शाळांची वसतिगृहे, शासकीय खानावळ, अंगणवाड्या आणि मध्यान्ह भोजन योजनांना १०० टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Gas Shortage Impact या संस्थांना गॅस पुरवठ्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, याची जबाबदारी गॅस एजन्सींवर सोपवण्यात आली असून त्यांना दैनंदिन अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे, व्यावसायिक आणि इतर सेवांच्या पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. उपाहारगृहे (हॉटेल्स), रेल्वे, संरक्षण क्षेत्र आणि हवाई वाहतूक यांना केवळ ७० टक्के पुरवठा केला जाईल. औषध उद्योग, बीज प्रक्रिया आणि मत्स्य पालन व्यवसायांना ५० टक्के गॅसवर समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान, सरकारी पातळीवर कागदी घोडे नाचवले जात असले, तरी जमिनीवरची परिस्थिती भयावह आहे. घरगुती गॅससाठी ग्राहकांना पहाटेपासूनच एजन्सीबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अनेक ठिकाणी काळ्या बाजाराची भीतीही व्यक्त केली जात आहे. छोटे व्यावसायिक संकटात : राज्यात जवळपास सर्वच शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यातच सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध घातल्यामुळे हॉटेल व्यावसायिकही अडचणीत सापडलेत. यामुळे फास्ट-फूड स्टॉल, छोटे हॉटेल चालक अडचणीत आले. काही ठिकाणी छोट्या सिलिंडरची किंमत सुमारे ४,००० पर्यंत गेल्याची तक्रार आहे. हे देखील वाचा : Gas Cylinders : गॅस सिलिंडरसाठी नागरीक हैराण.! मुंबईत ३० टक्के हॉटेल, उपाहारगृहे बंद