देशात समान भाषेची संकल्पना शक्य नसल्याची मांडली भूमिका
चेन्नई : हिंदी भाषेवरून निर्माण झालेल्या वादात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही उडी घेतली. हिंदी भाषा लादली जाऊ नये. देशात समान भाषेची संकल्पना राबवणे दुर्दैवाने शक्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
देशाची समान भाषा बनण्याची योग्यता हिंदीत आहे, अशा आशयाचे वक्तव्य अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्या वक्तव्यावर दाक्षिणात्य राज्यांमधील विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. हिंदी भाषा लादण्याला विरोध केला जाईल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी स्वीकारला. त्यानंतर राजकारणाच्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज होत असलेल्या रजनीकांत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
केवळ भारतासाठीच नव्हे; तर कुठल्याही देशासाठी ऐक्य आणि प्रगतीच्या दृष्टीने समान भाषा असणे ही चांगली बाब आहे. दुर्दैवाने, आपल्या देशात समान भाषेचा अवलंब होऊ शकत नाही. जर हिंदी लादली गेली तर तामीळनाडूसह कुठलेच दाक्षिणात्य राज्य ते स्वीकारणार नाही. उत्तरेकडील अनेक राज्यांनाही ते मान्य होणार नाही, असे रजनीकांत येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तामीळनाडू आणि कर्नाटकमधील प्रमुख राजकीय पक्षांनी हिंदीबाबतच्या वक्तव्यावरून शहा यांच्यावर याआधीच टीकास्त्र सोडले होते.