पुणे – सध्या विद्यापीठांतील चांगली महाविद्यालये स्वायत्तता घेत आहेत. यापुढे क्लस्टर विद्यापीठाकडे ओढा वाढेल. त्यामुळे पारंपरिक विद्यापीठांपुढे हे मोठे शैक्षणिक आव्हान असेल. हे आव्हान पेलण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या सदस्यांनी नवीन विद्यापीठ कायदा व परिनियमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, असे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मानव संसाधन विकास केंद्रातर्फे आयोजित चर्चासत्रात तावडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिरूद्ध देशपांडे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजीव सोनवणे उपस्थित होते. यावेळी तावडे यांनी मुंबईतून उपस्थितांशी व्हिडिओ कान्स्फन्सद्वारे संवाद साधला. “विद्यापीठ सुशासन : धोरणे व व्यवहार’ हा चर्चासत्राचा विषय होता.
तावडे म्हणाले, सर्व विद्यापीठात समानता येण्याच्या दृष्टीने नवीन विद्यापीठ कायदा लागू केला. त्याचबरोबरच वर्षभरात परिनियमही तयार केले. त्याद्वारे विद्यापीठाच्या शिक्षक, कर्मचारी व शिक्षणात एकसमानता येत आहे. त्यावर चर्चासत्रात आणखी विचारमंथन होईल. त्यातून ज्या गोष्टी अडचणी वाटत असतील, त्या दूर केल्या जातील. आवश्यक बदलही केले जातील. दरम्यान, मुक्त विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून, ही बाब विद्यापीठांच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठाचे व्यवस्थापन करण्याचे कार्य अधिकार मंडळाचे सदस्य करीत असतात. आता विद्यापीठ कायदा व परिनियमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी विद्यार्थ्याच्या दृष्टीने विद्यापीठाचे धोरण आखले पाहिजे व त्यादृष्टीने निर्णय घेतल्यास, शिक्षणासंदर्भात न्यायालयातील जाणारे खटले कमी होतील, असेही तावडे म्हणाले. यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन केले. डॉ. संजीव सोनवणे यांनी स्वागत केले. डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.
विद्यापीठे ही सामाजिक संस्थाच : अनिरूद्ध देशपांडे
भरमसाठ शुल्कामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश दार बंद होत आहेत. उच्चभ्रू वर्गासाठी खासगी विद्यापीठाचे दालन खुले आहे. अशा परिस्थितीत सर्वस्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी पारंपरिक विद्यापीठे ही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे ही विद्यापीठे ही सामाजिक संस्थाच आहे, अशा शब्दात अनिरूद्ध देशपांडे यांनी विद्यापीठाचे महत्त्व विशद केले.