Satara School : साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकनात’ जिल्हा राज्यात नंबर १
Satara School : सीईओ याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने मिळवला बहुमान; ८७ टक्के शाळांनी भरली पारदर्शक माहिती.

Satara School – शाळांची शैक्षणिक भौतिक गुणवत्ता मोजमाप करण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा एसक्युएएफ मूल्यांकन प्रक्रियेत सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे जिल्ह्यातील 87 टक्के शाळांनी या आराखड्यात आपली माहिती पारदर्शकपणे भरली आहे. शाळेची भौतिक, आर्थिक तसेच गुणवत्तापूर्ण माहिती राज्याकडे सादर केल्यानंतर त्या शाळांना गुणांकन दिले जाते. शिक्षण प्रक्रियेत या आराखड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळांनी हे मूल्यांकन पूर्ण केल्याने सलग तीन आठवडे जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. समग्र शिक्षा अभियान व पीएमसी शाळा खर्च करण्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर राहिला आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकनात विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पदवीचा आढावा घेऊन सुधारणा उपाय सुचवले जातात. अध्यापन शालेय वातावरण सुरक्षितता पालक सहभाग व नेतृत्व सुधारल्याने शाळेचा कारभार गुणवत्ता पूर्ण होतो.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने या आराखड्यात जिल्ह्याने महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. या आराखड्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना अध्ययन, अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी केंद्रीय शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण समितीच्या सभापती तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनामुळे शाळा मूल्यांकनात जिल्ह्याने आघाडी घेतल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली.
“शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा प्रक्रियेत शाळांची शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता मोजली जाते. शाळांनी वेळेत माहिती भरल्याने सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाावर आला आहे. भविष्यात या मूल्यांकनाची जिल्ह्याच्या गुणवत्ता विकासासाठी मदत होणार आहे.”
– याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी





