Satara: दहावी बारावी आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू, राजेश क्षीरसागर; बोर्डाचे अर्ज नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंतच
Satara नियमित कालावधीत अर्ज न भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून विलंब शुल्क आकारले जाते. दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरल्यास विलंब शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर दि. १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत 'अति- विलंब' शुल्कासह (प्रतिविद्यार्थी, प्रतिदिन ५० रुपये) अर्ज भरण्याची अंतिम संधी असेल.

Satara: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या आगामी फेब्रुवारी- मार्च २०२७ च्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे पडघम आता वाजू लागले आहेत. परीक्षेच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची मुदत केवळ ३१ ऑक्टोबरपर्यंतच असून, त्यानंतर वाढीव (विलंब) शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि शाळा प्रशासनाने शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. यावर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत अतिविलंबासह अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर कोणतेही स्थितीत परीक्षार्थींना अर्ज सादर करता येणार नाहीत, असे क्षीरसागर यांनी सपष्ट केले.
मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक अतिशय काटेकोरपणे निश्चित केले आहे. बारावीच्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी १४ ऑगस्टपासून, तर दहावीच्या माध्यमिक शाळांसाठी ३१ ऑगस्टपासून ऑनलाइन पोर्टल खुले करण्यात आले आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम तारीख असून, ही मुदत कोणत्याही स्थितीत वाढवून दिली जाणार नाही. सर्व शाळा प्रमुखांना व प्राचार्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे अर्ज विहित वेळेत भरले जातील, याची वैयक्तिक जबाबदारी घेण्याचे निर्देश श्री. क्षीरसागर यांनी दिले.
नियमित कालावधीत अर्ज न भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून विलंब शुल्क आकारले जाते. दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरल्यास विलंब शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर दि. १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘अति- विलंब’ शुल्कासह (प्रतिविद्यार्थी, प्रतिदिन ५० रुपये) अर्ज भरण्याची अंतिम संधी असेल. ३० नोव्हेंबरनंतर पोर्टल पूर्णपणे बंद होणार असून त्यानंतर शाळा व महाविद्यालयांना कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरता येणार नाहीत. अर्ज भरल्यानंतर शाळांनी ‘प्री- लिस्ट’ काढून विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जन्मतारीख आणि विषयांची रजिस्टरशी पडताळणी करावी. प्री- लिस्टवर विद्यार्थी व पालकांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. तसेच, फोटो अपलोड करताना तो व्यावसायिकरीत्या काढलेला आणि २५ ते ४० केबी या मर्यादेतच असावा. शुल्क भरताना केवळ भारतीय स्टेट बँकेच्या ऑनलाइन पेमेंट गेट वेचाच वापर करावा, रक्कम चलनाने भरावी. मंडळात रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.





