पर्यावरण : वाचवूया वनौषधी
सध्या वनौषधींचे प्रमाण घटत चालले आहे. म्हणून औषधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन, जंगलांचे संरक्षण, स्थानिक समुदायांचा सहभाग, वैज्ञानिक संशोधन आणि नियंत्रित वापर या सर्व बाबी एकत्रितपणे राबवाव्या लागतील.

– अनिल प्रकाश जोशी
Medicinal Plants : सध्या वनौषधींचे प्रमाण घटत चालले आहे. म्हणून औषधी वनस्पतींच्या (Medicinal Plants) नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन, जंगलांचे संरक्षण, स्थानिक समुदायांचा सहभाग, वैज्ञानिक संशोधन आणि नियंत्रित वापर या सर्व बाबी एकत्रितपणे राबवाव्या लागतील.
हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या आयुर्वेद शास्त्राचा पाया हा निसर्गाशी असलेल्या सुसंवादावर उभा होता. पर्वत, वन, नद्या, झरे, माती, हवामान आणि स्थानिक जैवविविधता यांच्या परस्पर संबंधांतून औषधी गुणांनी (Medicinal Plants) युक्त वनस्पती निर्माण होत असत. विशेषतः हिमालयीन प्रदेश हा दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिना मानला जात असे. त्या काळी निसर्गावर मानवी हस्तक्षेप अत्यल्प होता.
त्यामुळे वनस्पतींच्या मूळ गुणधर्मांचे जतन होत होते आणि त्यातून तयार होणार्या आयुर्वेदिक औषधांची परिणामकारकताही टिकून राहात होती. मात्र आधुनिक काळातील बदलत्या पर्यावरणीय आणि आर्थिक व्यवस्थेमुळे ही संपूर्ण साखळी धोक्यात आली आहे.
आज जंगलांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. नद्या आटत आहेत, हवामान बदलत आहे, तापमान वाढत आहे आणि मातीची गुणवत्ता खालावत चालली आहे. या सर्वांचा सर्वाधिक परिणाम जर कोणावर झाला असेल, तर तो औषधी वनस्पतींवर. कारण प्रत्येक वनस्पतीची वाढ ही विशिष्ट भौगोलिक आणि पर्यावरणीय (Medicinal Plants) परिस्थितींवर अवलंबून असते.
एखाद्या वनस्पतीला आवश्यक असलेली आर्द्रता, सावली, उंची, तापमान आणि मातीतील सूक्ष्म घटक बदलले, तर तिच्या औषधी गुणधर्मांमध्येही बदल होतो. त्यामुळे केवळ वनस्पतीचे नाव किंवा तिची बाह्य रचना जपून उपयोग होत नाही; तिच्या अंतर्गत औषधी सामर्थ्याचे जतन होणे अधिक महत्त्वाचे असते. आयुर्वेदातील बहुतेक औषधे ही विविध वनस्पतींच्या मिश्रणातून तयार होतात.
त्रिफळा, अश्वगंधा, च्यवनप्राश किंवा इतर अनेक पारंपरिक औषधांचे उदाहरण घेतले, तरी त्यामध्ये अनेक दुर्मिळ वनस्पतींचा समावेश असतो. परंतु आज या वनस्पतींपैकी अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. काही वनस्पती तर प्रत्यक्षात जंगलांतून जवळपास नाहीशा झाल्या आहेत. परिणामी, बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक आयुर्वेदिक उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. उत्पादनांची नावे पारंपरिक असली, तरी त्यामागील मूळ औषधी सामर्थ्य कमी होत चालले आहे. ही स्थिती आयुर्वेदासाठी गंभीर इशारा मानावी लागेल.
या संकटामागे व्यापारीकरण हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी आयुर्वेद ही घराघरातील जीवनपद्धती होती. स्थानिक ज्ञान, अनुभव आणि निसर्गाशी असलेले निकट नाते यांमधून ती विकसित झाली होती. मात्र कालांतराने औषधी वनस्पती या मोठ्या बाजारपेठेचा भाग बनल्या. जंगलांतून मोठ्या प्रमाणावर वनस्पती गोळा करून त्यांचा व्यावसायिक वापर सुरू झाला.
मागणी वाढत गेली, तसा अति-दोहनही वाढला. अनेक कंपन्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी पर्याय शोधले, परंतु त्यातून औषधांच्या मूळ गुणवत्तेवर परिणाम झाला. वनस्पतींच्या संख्येपेक्षा त्यांच्या गुणधर्मांचे जतन अधिक महत्त्वाचे असते, ही बाब दुर्लक्षित झाली. औषधी वनस्पतींची शेती हा एक पर्याय पुढे आला असला, तरी तो सर्वार्थाने समाधानकारक नाही.
कारण एखादी वनस्पती नैसर्गिक अधिवासात ज्या गुणांनी विकसित होते, तेच गुण कृत्रिम किंवा वेगळ्या वातावरणात तितक्याच प्रभावीपणे टिकतीलच असे नाही. विज्ञानाच्या भाषेत ज्यांना ‘सक्रिय घटक’ म्हटले जाते, ते घटक स्थानिक हवामान, माती आणि परिसंस्थेशी घट्ट जोडलेले असतात. त्यामुळे केवळ व्यापारी शेती करून आयुर्वेदिक वनस्पतींची (Medicinal Plants) खरी गुणवत्ता जपता येणार नाही. त्यासाठी त्या वनस्पतींच्या मूळ अधिवासांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.
आज जगभरात आयुर्वेदाविषयी नव्याने आकर्षण निर्माण होत आहे. आधुनिक औषधपद्धतींच्या मर्यादा आणि दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक नैसर्गिक उपचारांकडे वळताना दिसतात. भारतीय आयुर्वेदिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ही स्थिती भारतासाठी आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. मात्र जर औषधी वनस्पतींची गुणवत्ता सातत्याने खालावत गेली, तर आयुर्वेदाची विश्वासार्हताच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हा विषय केवळ पर्यावरणीय किंवा सांस्कृतिक नसून आर्थिक आणि आरोग्यविषयकही आहे.
यासाठी आता व्यापक आणि दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. औषधी वनस्पतींच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन, जंगलांचे संरक्षण, स्थानिक समुदायांचा सहभाग, वैज्ञानिक संशोधन आणि नियंत्रित वापर या सर्व बाबी एकत्रितपणे राबवाव्या लागतील. हिमालयासारख्या संवेदनशील प्रदेशांतील जैवविविधतेचे जतन करणे ही राष्ट्रीय प्राधान्याची बाब बनली पाहिजे.
त्याचबरोबर पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि स्थानिक वैद्यकीय परंपरांचे पुनरुज्जीवनही आवश्यक आहे. औषधी वनस्पतींकडे केवळ बाजारातील उत्पादनाच्या परिप्रेक्ष्यातून पाहून चालणार नाही. त्या भारतीय संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या ज्ञानपरंपरेच्या प्रतीक आहेत. त्यांच्यामध्ये निसर्ग, विज्ञान आणि मानवी अनुभव यांचा समन्वय दडलेला आहे.
म्हणूनच या वनस्पतींचे संवर्धन म्हणजे केवळ काही प्रजाती वाचविणे नसून भारतीय जीवनदृष्टीचे जतन करणे होय. निसर्गाशी असलेले हे नाते जर आपण टिकवू शकलो नाही, तर भविष्यात आयुर्वेदाची ओळख फक्त नावापुरती उरेल. त्यामुळे औषधी वनस्पतींचे संरक्षण ही आजच्या काळातील अत्यंत गंभीर आणि अपरिहार्य जबाबदारी मानावी लागेल.






