इंडस्ट्री, लघुउद्योजक, सोने-चांदी, वाहन, बांधकाम बाजारपेठा ठप्प
पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दरमहा हजारो कोटींची उलाढाल असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची संपूर्ण उलाढाला “करोना’मुळे ठप्प झाली आहे. शहरातील औद्योगिक वसाहत, लघुउद्योजक, मोठे उद्योजक लॉकडाउनमुळे अक्षरश: चिंतेत पडले आहेत. सोने चांदीसह वाहन, बांधकाम बाजारही पूर्णपणे बंद झाला आहे. 30 एप्रिलनंतर आणखी लॉकडाउन वाढण्याची भीती उद्योजकांना सतावत असून, लॉकडाउन वाढल्यास औद्योगिक वसाहत अक्षरश: कोलमडून जाईल, अशी शक्यता अनेकांकडून वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक आणि कामगारनगरी म्हणून ओळखले जाते. शहरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांची संख्या मोठी आहे. तर या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या लघुउद्योजकांची संख्याही सात ते दहा हजारांच्या आसपास आहे. मोठ्या कंपन्या आणि लघुउद्योजकांकडे लाखो कामगार काम करीत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे सर्वच्या सर्व उद्योग बंद आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सध्या कार्यरत आहेत. यामध्येही कामगारांची संख्या अत्यंत कमी आहे. लॉकडाउनमुळे कोणतीच ऑडर नसल्यामुळे घरात बसून काम देणेही कंपन्यांना शक्य नाही. मार्च महिन्याचे वेतन माणुसकीच्या भावनेतून अनेक कंपन्यांनी केले. मात्र एप्रिलचे वेतन कसे करायचे हा प्रश्न अनेक उद्योजकांसमोर आहे. सर्वच आवक-जावक, कॅश फ्लो बंद असल्यामुळे उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे.
लॉकडाउन वाढविल्याने 14 एप्रिलनंतर सुरळीत होण्याची शक्यताही मावळल्याने आता 30 एप्रिलची वाट पाहण्याची वेळ या उद्योजकांवर आली आहे. सध्या वाढणारे करोनाचे रुग्ण पाहता एप्रिलनंतर लॉकडाउन सुरू राहिल्यास अनेक उद्योगांचे दिवाळे निघण्याची भीती व्यक्त होत आहे. कामच नसल्याने वेतन तरी देणार कुठून? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. आता सर्व भिस्त शासकीय मदतीवरच असल्याचे सांगण्यात येत आहे. असाच प्रकार इतर बाजारांमध्येही आहे. किराणा, मेडिकल, हॉस्पिटलवगळता सर्वच व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत.
शहरात तेजीने वाढणारा बांधकाम व्यवसाय, सोने-चांदी, वाहन, इलेक्ट्रीक बाजारपेठांसह सर्वच्या सर्व व्यवसाय बंद आहेत. या व्यवसायाची रोजची उलढाल किमान दहा कोटींच्या आसपास आहे. हा पूर्णच व्यवसाय बंद झाल्याने शहरातील हजारो कोटींची उलाढाल थंडावली आहे. लॉकडाउन एप्रिलनंतरही वाढल्यास वरील व्यवसायातील काही मोजके व्यवसायिक वगळता इतरांवरही गदा येणार आहे. व्यवसायिकच अडचणीत येत असल्याने त्यांच्यावर अलवंबून असणाऱ्यांची अवस्था अतिशय वाईट बनली आहे.
कर्जाचा बोजा वाढतोय
व्यवसाय ठप्प असल्याने कर्जाचा बोजा अनेक व्यवसायिकांवर वाढत चालला आहे. हप्ते बंद असले तरी व्याज आणि चक्रवाढ व्याज सुरूच असल्यामुळे कर्ज फेडण्यात भविष्यात अडचणी येण्याची भीती व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. लॉकडाउन संपल्यानंतर लगेच मागणी वाढण्याची शक्यता नसल्याने तसेच मंदीचे सावट घोंघावण्याची शक्यता असल्याने उद्योजक आणि व्यावसायिक खचून चालले आहेत.
प्रोत्साहनपर योजनांची आवश्यकता
करोनामुळे गेली महिनाभर बंद असलेले उद्योग आणखी पुढील वीस दिवस बंद राहणार आहेत. दीड महिना व्यवसायच बंद असल्यामुळे वितरक, पुरवठादार, खरेदीदार आणि उत्पादक सर्वच अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाकडून आता प्रोत्साहनपर योजनांची आवश्यकता व्यक्त होत आहे. कामगारांच्या वेतनासाठीही शासनाने हातभार लावावा, अशी मागणी होत आहे.