जनते पाठोपाठ वरिष्ठांना मनमानीचा फटका; तलाठ्याची “लेना’ बॅंक जोमात
सातारा, दि.17
गावागाड्यातील महत्वाचे पद म्हणून जनतेत प्रतिष्ठा असलेला गाव कामगार तलाठी सामान्य जनतेला नाडवतो, अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, माण तालुक्यातील वाकी म्हसवड गावच्या आण्णासाहेबांनी थेट तहसीलदारांच्या आदेशालाच कोलदांडा घातला आहे. या अण्णासाहेबांनी काय देता याची चाचपणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाकी- म्हसवड या गावातून सर्वाधिक वाळूचा उपसा होत असताना आण्णासाहेब भलत्याच गोतावळ्यात अडकल्याचे अनेकजण खासगीत सांगत असून याची खुमासदार चर्चा तालुक्यात आहे.
त्याचे झाले असे की, वरकुटे- म्हसवड (ता.माण) या गावातून वाळूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी माणच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे आल्या होत्या.
त्याबाबत त्यांनी या गावचे तलाठी असलेल्या नरळे आण्णासाहेबांना वेळोवेळी कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. मात्र, डोळ्यादेखत वाळूच्या गाड्या भरून जात असताना त्याकडे डोळेझाक करणाऱ्या अण्णासाहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच प्रांताधिकारी जिरंगे यांना कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला होता.
दि.29 जून रोजी स्वत: प्रांताधिकारी व त्यांच्या टिमने माण तालुक्यातील एका बड्या वाळू सम्राटाला धडा शिकवायचा म्हणून अख्खा तालुका पिंजून काढला. तालुक्यातील नदी-नाले गाडीच्या उजेडावर शोधले पण तो वाळू सम्राट काही हाताला लागला नाही. अन् लागण्याची शक्यता ही नव्हती कारण कुंपनच शेत खात असेल तर काय होणार? शेवटी-शेवटी प्रांताधिकारी व टिम पहाटेच्या सुमारास दहिवडीकडे निघाले असताना ढाकणी फाट्यावर त्यांना दोन डंपर दिसून आले.
त्यांनी दोन्ही डंपर ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्यानंतर दोन तीन दिवस उजाडले तरी कारवाई होत नसल्याने दररोज पोलीस ठाण्यात हेलपाटे मारणाऱ्या त्या डंपरच्या चालकांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना विचारणा केली असता महसुलचा माणूस फिर्याद देण्यासाठी आल्याशिवाय गुन्हा दाखल होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर वैतागलेल्या त्या चालकांनी घर गाठले.
दि.2 जुलै रोजी माण तालुक्याच्या तहसीलदार बी.एस.माने यांनी वरकुटे- म्हसवड गावचे तलाठी नरळे यांना गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र दिले. तरीही गुन्हा दाखल करण्याऐवजी त्या डंपरच्या मालकाकडे हस्ते परहस्ते देण्या-घेण्याची बोलणी सुरू ठेवण्यातच आण्णासाहेबांनी धन्यता मानल्याची चर्चा आहे. परिणामी दि.29 जून रोजी पकडलेल्या गाड्यांवर गुन्हा दाखल करण्यास 16 जुलैचा दिवस उजाडला. दरम्यानच्या काळात गुन्हा दाखल होत नसल्याने डंपर मालकाने प्रांताधिकाऱ्याना याबाबत कळवले. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न झाल्यास नोटीस काढण्याचा इशारा दिला.
इतक्या दिवसांनी कुठेच धागा जुळत नसल्याने आण्णासाहेबांनी गुन्हा दाखल करताना थेट डंपरच्या मालकाला धडा शिकवण्यासाठी घटना घडली तेव्हा तिथे नसतानाही गुन्ह्यात त्याच्या नावाचा उल्लेख करून महसुली खुट्टी मारल्याचा निरोप धाडला.
हे सगळे करत असताना आण्णासाहेबांनी दि.2 रोजी आलेल्या वरिष्ठांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता लावून आपले कोणीच काही करू शकत नसल्याची टिमकी वाजवल्याने त्यांना कोणाचा धाक आहे की नाही, असा प्रश्न आता थेट महसुलच्या वर्तुळातच विचारला जात आहे.
… म्हणे कामात व्यस्त होतो
गुन्हा दाखल करताना गाव कामगार तलाठी नरळे यांना वरिष्ठांचे दि.2 रोजी पत्र आले होते. मात्र, मी कामात व्यस्त असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानिमीत्ताने प्रश्न असा पडतो की, तलाठी अण्णासाहेब नोकरीला वरकुटे म्हसवडला तर राहायला पानवणला आहेत. मग येता जाता जरी वेळ काढला असता तरी गुन्हा दाखल झाला असता. असे काय काम होते की, त्यांना वाळूच्या गाड्या पकडण्यास जमत तर नाहीच पण वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळण्यासही जमत नाही. वरिष्ठांनी दिलेला हा आदेश कामाचा भाग नव्हता का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अठरा दिवसांनी दाखल झालेल्या गुन्ह्याचे भविष्य काय?
कोणतीही घटना घडल्यानंतर किमान 48 तासांत गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त असते. मात्र, तब्बल अठरा दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. अठरा दिवसात वाळूची खडी व खडीची वाळू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गुन्ह्याचे भविष्य काय असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चौकशी करून कारवाईचे आदेश दिले जातील
संबंधितांनी जे काम करायला पाहिजे होते ते आम्ही केले आहे. त्यांना सुचना दिल्यानंतरही त्यांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब का केला याची माहिती घेतली जाईल. तसेच त्यात काही चुकीचे आढळून आले तर संबंधिताची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले जातील.
– अश्विनी जिरंगे (प्रांताधिकारी माण)