प्रभात वृत्तसेवा दहिवडी – माण तालुक्याच्या राजकारणात आंधळी जिल्हा परिषद गट हा केवळ एक भौगोलिक भाग नसून तो सत्तेचा कणा राहिला आहे. आगामी निवडणुकीत हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आणि त्यासोबतच पंचायत समितीच्या सभापतिपदाचे द्वार खुले झाल्याने या मतदारसंघातील राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे. प्रस्थापित नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई आणि नव्या दमाच्या इच्छुकांमधील महत्त्वाकांक्षा यामुळे आंधळीच्या रणांगणात आतापासूनच ठिणगी पडली आहे. एकेकाळी दिवंगत सदाशिवराव पोळ यांच्या एकहाती अंमलाखाली असलेला हा गट २००७ नंतर आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या बंधूंच्या राजकारणाभोवती फिरत राहिला आहे. मात्र, यंदाची स्थिती वेगळी आहे. भाजपच्या गोटातून सोनल गोरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली, तरी पक्षांतर्गत असलेल्या इच्छुकांच्या भाऊगर्दीने पक्षधुरिणांची डोकेदुखी वाढवली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीनाक्षी काळे, मीनाक्षी सत्रे आणि कौशल्या जगदाळे यांच्या समर्थकांनीही आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, विखुरलेल्या विरोधकांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडीचा प्रयोग करण्याचा चंग बांधला आहे. दादा यशवंत दडस यांच्या पत्नी योगिता दडस आणि दीपाली जगदाळे यांची नावे चर्चेत ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप आणि गोरे विरोधक एकाच नावावर शिक्कामोर्तब करणार का, हा कळीचा मुद्दा आहे. सभापतिपदामुळे आले महत्त्व या निवडणुकीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पंचायत समितीचे सभापतिपद. हे पद ‘सर्वसाधारण (खुले )असल्याने मलवडी आणि आंधळी या दोन्ही गणांतील उमेदवारीला सोन्याचे मोल आले आहे. मलवडी गणात भाजपचे बाळासाहेब कदम यांच्यासमोर योगेश घाडगे आणि सचिन मगर यांनी आव्हान उभे केले आहे. आंधळी गणात अर्जुन काळे आणि दादासाहेब काळे यांच्या नावांची चर्चा आहे. तर शेखर गोरे गटाकडून वसंत सजगणे हेच उमेदवार असतील अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.