प्रभात वृत्तसेवा वाई – पश्चिम भागातील सामाजिक-राजकीय जीवनात ठळक ओळख असलेले लोकनेते बापूसाहेब शिंदे, युवा नेते विकास शिंदे, प्रवीण शिंदे तसेच वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री आ. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पश्चिम भागातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. या प्रवेशप्रसंगी किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, रमेश गायकवाड, महादेव मसकर, शशिकांत पवार, वीर, विलास येवले, काशिनाथ चोरट, विक्रांत डोंगरे, सचिन सावंत, डॉ. मंगेश महांगडे, बाबूनाना शिर्के, धनंजय महांगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. युवा नेते विकास शिंदे म्हणाले, “आज देशात आणि राज्यात भाजपाने धर्म, जात आणि भावनांच्या नावावर समाजात विष पेरण्याचे काम सुरू केले आहे. विकासाच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात सत्तेच्या व पैशाच्या जोरावर लोकशाही गुदमरवायची, हेच भाजपाचे खरे धोरण आहे. पश्चिम भागाचा विकास हा कधीच भाजपच्या अजेंड्यावर नव्हता. फसवी आश्वासनेच दिली गेली. ना. मकरंद पाटील यांनी आम्हाला पक्षात सामावून घेत पश्चिम भागाचे पालकत्व स्वीकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा यशवंत विचार हा सामान्य माणसाच्या विकासाचा विचार आहे. विविध पक्षांकडे आम्ही गेलो; पण सर्वत्र स्वार्थी आणि संधीसाधू राजकारणच पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिंदे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे.यावेळी प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप वाडकर यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पुजारी यांनी आभार मानले. भाजपाचे सत्तालोलुप राजकारण संपवणार – ना. मकरंद पाटील ना. मकरंद पाटील म्हणाले, “बापूसाहेब शिंदे यांनी गेली ३०-४० वर्षे कोणताही सत्तेचा लोभ न ठेवता समाजकारण केले. पश्चिम भागातील घराघरांत त्यांचे नाव पोहोचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिंदे कुटुंब व कार्यकर्त्यांचा मान-सन्मान शेवटपर्यंत राखला जाईल. विकास शिंदे यांचे तीन तालुक्यांत मजबूत युवक संघटन आहे. भाजपमध्ये समाजकारणाला किंमत नाही; तिथे फक्त सत्तेचा अहंकार आणि पैशाचा माज आहे. वाई नगरपालिकेत भाजपाने सत्तेसाठी घाणेरडे डाव खेळले. पाचगणी, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी पैशाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र जनतेने योग्य वेळी भाजपाला जागा दाखवली. आता पश्चिम भागात भाजपाचे सत्तालोलुप राजकारण कायमचे संपवण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”