प्रभात वृत्तसेवा मेढा – निवडणुका आल्या की जावळी तालुक्यातील विरोधकांना जावळी तालुक्यातील जनतेचा खोटा कळवळा येतो. मंत्रिपद असताना तालुक्याच्या विकासासाठी एकही दमडी निधी न देणार्यांनी जनतेचा बुद्धिभेद करू नये. मी कधीही दादागिरी व दहशतीचे राजकारण केले नाही. विरोधकांनी पातळी सोडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक जावळीतील जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्यात निश्चित आहे, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला. तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व जागा लढविणार असून आम्ही या जनतेच्या आर्शिवादाने सर्व जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेघर येथे आयोजित स्नेहमेळावा व कुसुंबी जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे,जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, राजू भैय्या भोसले, अर्चना रांजणे, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, पांडुरंग जवळ, मेढ्याच्या नगराध्यक्ष रुपाली वारागडे, हभप प्रविण महाराज शेलार नगरसेवक शिवाजीराव देशमुख, विकास देशपांडे, रिकी तिवाटने, शिवाजी गोरे, सुशांत कांबळे, नितीन मगरे, तेजस्वी इगावे, आनंदी करंजेकर, पुष्पा मुकणे, सुनीता तांबे, अनघा करंजेकर, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, सागर धनावडे, नाना जांबळे, विलासबाबा जवळ, बबन बेलोशे, अर्जुन जाधव, हरिभाऊ शेलार, मारुती चिकणे आदींची उपस्थिती होती. मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जावळीतील जनतेने भरभरून प्रेम दिल्याने सलग तीन टर्म आमदार म्हणून मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकासकामे करत असून येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवणार आहे. मेढा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भविष्यात नगरपंचायतची नगर परिषद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मेढा शहरात विविध योजना राबवून मेढा शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी काम करणार आहे. जावळी तालुक्यातील सर्व गावांतील स्मशानभूमीला जोडणारे पक्के रस्ते करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून काम करत आहे.बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून जावळी तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्री म्हणून काम करत आहे. जावळी तालुक्यातील नागरी सुविधा परिपूर्ण होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. दिलेला शब्द पाळण्याचे काम स्व. भाऊसाहेब महाराज यांच्यापासून सुरू आहे. मी देखील दिलेला शब्द पाळतो त्यामुळे जावळीतील जनता नेहमीच माझ्या पाठीशी राहत आहे. जावळी तालुक्यातील जनतेमुळेच मला मंत्रिपद मिळाले आहे. विरोधकांनी तालुक्यात एकही विकासकामे केली नाहीत केवळ स्वार्थासाठी बाहेरून येणार्या विरोधकांना जावळीतील जनता निश्चितच त्यांची योग्य जागा दाखवून देईल. जिल्हा बँकेचे संचालक रांजणे यांनी तालुक्यात विकासकामांसाठी नेहमीच पाठपुरावा केला असून रांजणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही मंत्री भोसले यांनी दिली. विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन -पुनवडी पूल 11 कोटी रुपये. -आंबेघर येथे रामजी बुवा पूल 8 कोटी रुपये. -वरोशी ते वाहिटे रस्ता 10 कोटी रुपये. -केळघर-कुरळोशी रस्ता अडीच कोटी रुपये. -मालचौंडी-दुंद रस्ता अडीच कोटी. -वाटंबे ते केडंबे पुलासाठी सहा कोटी रुपये.