प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी व महिलांच्या विकासासाठी भाजपने राबविलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचल्या आहेत. रहिमतपूर पालिकेवर पंचवीस वर्षे राष्ट्रवादीच्या विचारांची सत्ता होती. संधी मिळूनही त्यांना रहिमतपूरचा विकास करता आला नाही. आता शहरात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. पालिकेत परिवर्तन अटळ असून रहिमतपूरच्या चौफेर विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चौकात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आ. मनोजदादा घोरपडे, निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, सुनील काटकर, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम, दौलतनाना शितोळे, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, सुखदेव माने, नंदकुमार माने – पाटील, निलेश माने, विक्रमबाबा कदम, सचिन बेलागडे, भीमराव पाटील, साहेबराव माने, विजयराव माने, किरण भोसले, भगवान माने, अमर मदने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. वैशाली माने यासह सर्व उमेदवार उपस्थित होते. ते म्हणाले की, ही विराट सभा म्हणजे सौ. चित्रलेखाताई माने – कदम, संपतराव माने, निलेश माने यांच्या ताकदीचे प्रतीक आहे. जनता आता नगरपालिकेत परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही. गेली पंचवीस वर्षे सत्ताधाऱ्यांनी जनतेला आमिषे दाखवली. आता जनता सुज्ञ झाली आहे. त्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडणार नाही. मतदारांनी खांदेपालट करीत नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने नगरपालिकेची सत्ता भाजपकडे देण्याची योग्य वेळ आली आहे.ना.जयकुमार गोरे म्हणाले की, रहिमतपूरच्या जनतेने विश्वासाने सत्ताधाऱ्यांना अनेक वर्षे संधी दिली. पण विकास करता आला नाही. आता नव्याने नव्या लोकांना संधी देण्याची आवश्यकता आहे. शहराच्या विकासाचे निश्चित असे व्हिजन घेऊन आमचे उमेदवार निवडून रिंगणात उतरले आहेत. एकदा भाजपच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या. आमचे उमेदवार संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत. आ. मनोज घोरपडे म्हणाले, सत्ताधाऱ्यांची पंचवीस वर्षे पालिकेत सत्ता आहे. प्रत्येक वर्षी तोच तोच जाहिरनामा फिरतो आहे. विकासाच्या पोकळ गप्पा ते मारत आहेत. चौकात उजेड असला तरी गल्लीबोळात अंधार आहे. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जनतेच्या मनातील स्वप्नांना आकार आम्हाला द्यायचा आहे. परिवर्तनाच्या लाटेत सामील झालेले हे लोकच आता परिवर्तन करणार आहेत. सौ चित्रलेखा माने – कदम म्हणाल्या की, भाजपची विचारधारा व्यापक आहे. संविधानाला मानणारा भाजप सर्व जातीधर्मांना घेऊन पुढे जात आहे. भाजपच्या माध्यमातून येथील मुस्लिम, बौद्ध समाजाला भरीव निधी उपलब्ध झाला आहे. पण विरोधक खोटा अपप्रचार करुन सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडू नका.