प्रभात वृत्तसेवा पुसेगाव – मनातील मालिन्य, द्वेष भावना काढून टाकण्याची शक्ती प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीत आहे. या देवस्थानच्या विकासासाठी, भरभराटीसाठी तसेच शासनदरबारी ट्रस्टचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांनी दिले. सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आ. महेश शिंदे, माजी जलसंपदा मंत्री व विधान परिषदेचे आ. शशिकांत शिंदे, कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे, आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी देवस्थान ट्रस्ट चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे, तहसीलदार बाई माने, गट विकास अधिकारी योगेश कदम, प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन नागरगोजे व इतर मान्यवर उपस्थित होते.आ. महेश शिंदे म्हणाले, कृषी विभागाने जागोजागी एआय सेंटर उभारावेत. जेणेकरून शेतकर्यांना शेतीसाठी त्याचा वापर करता येईल. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाद्वारे शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी निधी मिळावा, शासकीय विद्यानिकेतन कडून ट्रस्ट ला दिलेल्या जागेचा प्रश्न शासनाने तातडीने निकाली काढावा, तसेच देवस्थानला अ वर्ग दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ. मनोज घोरपडे म्हणाले, शेतकर्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी कृषी प्रदर्शने व शेतकर्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे.यात्रेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी देवस्थान ट्रस्टला निधीची गरज असल्याचे नमूद करत ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी देवस्थान ट्रस्टचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली. दरम्यान, देवस्थान ट्रस्टच्यावतीने निवडक शेतकर्यांना सेवागिरी कृषीनिष्ठ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गैोरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनराव गुरव, तर आभार रणधीर जाधव यांनी मानले.