प्रभात वृत्तसेवा सातारा : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप दिवशी (दि. ४) ‘फोक अख्यान’ या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे अभिलाषी दर्शन घडविणाऱ्या दिमाखदार अशा सांगितिक कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मात्र, या सांगितिक मेजवानीवर तांत्रिक बिघाडाचे सावट आले खरे, पण सातारकरांनी दाखवलेल्या अभूतपूर्व संयमाने या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. रात्री नऊचा कार्यक्रम दहा वाजता सुरू होऊनही उपस्थित २० हजार रसिकांनी शांतता राखत सातारा ही केवळ शौर्याचीच नव्हे, तर सुसंस्कृतपणाचीही राजधानी असल्याचे सिद्ध केले.तांत्रिक अडचणींमुळे, सुरावटीस लागलेल्या विलंबाने कार्यक्रम नऊच्या ठरलेल्या वेळेऐवजी तब्बल एक तास उशिरा म्हणजे दहा वाजता सुरू झाला. संतप्त होण्याऐवजी २० हजार सातारकर प्रेक्षकांनी अतिशय संयमाने वाट पाहिली. रात्री १० वाजता जेव्हा प्रत्यक्ष सादरीकरण सुरू झाले, तेव्हा सातारकरांनी त्याच उत्साहात कलाकारांना दाद दिली. कार्यक्रमाचा विलंब विसरून रसिक कलेच्या आनंदात न्हाऊन निघाले. कसला गोंधळ, आरडाओरडा न करता त्यांनी उदात्त सांस्कृतिक वारसा जपला. रसिक सातारकरांच्या या लोभस आणि उदात्त धीराने सातारा शहराचा सांस्कृतिक वारसा उजळला, हे मात्र खरे ! काही उत्साही रसिक संध्याकाळी आठ वाजेपासून मंडप क्रमांक एक मध्ये जमले होते. निर्मिती रणजीत गुगळे आणि भूषण मेहरे यांची असलेल्या या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे जिवंत चित्रण केले. सातारकरांची ही संयमशीलता पाहून आयोजक आणि उपस्थित मान्यवरही मूकस्तंभित झाले. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या चार दिवसीय संमेलनाचा हा शेवटचा प्रमुख कार्यक्रम यशस्वी झाला. संयम व रसिकता यांचा अनोखा संगम या संमेलनात चार दिवस कवीकट्टा, गझलकट्टा, परिसंवादांसह, विक्रमी पुस्तक खरेदीसह विविध कार्यक्रम रंगले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप सोहळ्यात ‘फोक आख्यान’ने समारोपाला साजेसे तेज दिले. सातारकरांनी दाखवलेला हा धीर साहित्यप्रेमाचा खरा उत्सव ठरला. तसेच सातारकरांचा संयम आणि त्यांची रसिकता यांचा अनोखा संगम या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पाहुण्यांना पाहायला मिळाला. सातारकरांची ही शिस्त, कार्यक्रमाबद्दलचा आदर आणि सांस्कृतिक जाणीव साहित्य संमेलनाच्या गौरवात भर घालणारी ठरली.