Mahabaleshwar Election – गेल्या काही दिवसांपासून गावोगावी रंगलेला प्रचाराचा धुराळा अखेर शांत झाला असून, महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीसाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मशिनरी निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी आणि चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गम भागातील केंद्रांवरही यंत्रणा वेळेत पोहोचली असून शांततेत मतदान पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे.उद्या होणाऱ्या मतदानामुळे अनेक दिग्गज उमेदवारांचे नशीब आणि त्यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेले अपार कष्ट मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहेत. आपली गणिते जुळवण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदारांना केंद्रापर्यंत खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज ‘फिल्डिंग’ लावून आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवारांकडून आता ‘डोअर टू डोअर’ वैयक्तिक संपर्कावर भर दिला जात आहे. मतदान ही लोकशाहीची ताकद आहे. मतदान यंत्रणा सुव्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, या लोकशाहीच्या उत्सवात नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद तालुक्यात तीन प्रमुख पक्ष आमने सामने उभे ठाकले आहेत. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, नेहमीप्रमाणे ६० ते ७० टक्के मतदान होईलच; परंतु विजयाचा खरा मार्ग हा उरलेल्या ३० ते ४० टक्के मतदारांच्या हातात आहे. जो उमेदवार या सुप्त किंवा तटस्थ राहिलेल्या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यात यशस्वी होईल, तोच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा ‘बादशहा’ ठरेल. निर्णायक मतदान कोणाचे? अनेकदा ३० ते ४० टक्के मतदार विविध कारणांमुळे केंद्रापर्यंत पोहोचत नाहीत. या लोकांना कोणीही निवडून आले किंवा नाही आले याचा काही फरक पडत नसतो अशांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत यातच 30 ते 40 टक्के लोक यामध्ये असल्याचे बोलले जाते मात्र, यंदा हीच मते निर्णायक ठरणार असल्याने, सर्वच उमेदवारांनी आपले लक्ष या गटावर केंद्रित केले आहे. शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, राजकीय पक्षांना हे उमजले आहे की, मतदानाचा आकडा जेवढा वाढेल, तेवढा फायदा विजयाचे अंतर कापण्यासाठी होईल. त्यामुळे केवळ मतदान होणे महत्त्वाचे नसून, ते शंभर टक्के व्हावे, यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. महाबळेश्वरच्या डोंगराळ भागात आणि ग्रामीण पट्ट्यात मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. उद्या होणाऱ्या मतदानात जर मतदानाची टक्केवारी ७० च्या वर गेली, तर तालुक्यात मोठा राजकीय उलटफेर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.