Ramdas Athawale : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. राज्यसभेसाठी नामांकन होण्यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी बाकी असताना त्यांची राज्यसभेवर निवड झाली. शनिवारी धुळे येथे महाराणा प्रताप चौकात आठवले (Ramdas Athawale) यांची सभा झाली. राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा होता. सभेत त्यांनी आपली लोकप्रियता आणि राजकीय सामर्थ्य यावर जोरदार दावा केला. “मी संसदेत बसून चारोळ्या करतो, त्यामुळे जगभरात माझे फॅन तयार झाले आहेत. माझी लोकप्रियता सतत वाढत आहे,” असे ते म्हणाले. आठवले यांनी पुढे एक धक्कादायक वक्तव्य केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. “मी ज्यांच्यासोबत असतो, ते सत्तेत असतात. मी सोबत असलो की त्या पक्षाला १०० टक्के सत्ता मिळते, हा आजवरचा पायंडा आहे. त्यात बदलाची शक्यता अजिबात नाही,” असा दावा त्यांनी केला. Ramdas Athawale त्यांनी आणखी एक खळबळजनक विधान केले: “जोपर्यंत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी मंत्री असेल.” त्यांनी पुढे म्हटले, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लवकरच राष्ट्रीय पक्ष होणार आहे. भाजपला आमच्या पक्षाची मदत होते. मी त्यांच्यासोबत जोपर्यंत आहे, तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील.” संविधान बदलणार नाही; विरोधकांना संधी नाही आठवले यांनी विरोधकांवरही टीका केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत याबाबत खोटे नॅरेटिव्ह सेट केले होते, त्याचा फटका बसला. आता मात्र विरोधकांना केंद्रात सत्तेत येण्याची कोणतीही संधी मिळणार नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व समाजांचा पाठिंबा असलेले नेते आहेत. ते अतिशय चांगला कारभार करत आहेत. भारतीय संविधान सर्वसामावेशक आणि व्यापक हेतू असलेले आहे. त्यामुळे भारताची स्थिती कधीही श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळसारखी होणार नाही.” कार्यकर्ता मेळावा धुळे दौऱ्यादरम्यान आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “रिपब्लिकन चळवळीची विचारधारा अधिक बळकट करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालत वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी काम करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. या सभेला माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आरपीआय नेते बाबुराव कदम, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.