कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारयाद्या पडताळणी (एसआयआर) विरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. मनमानी आणि सदोष स्वरूपाची एसआयआर प्रक्रिया थांबवा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. त्याविषयीचे आणखी एक पत्र त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पाठवले. संबंधित मुद्द्यावर मी याआधी दोन पत्रं पाठवली. आता स्थिती आणखीच बिकट झाल्याचे दिसते. कुठल्या नियोजनाशिवाय राबवल्या जाणाऱ्या एसआयआर प्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आहेत. ती प्रक्रिया अशीच चालू राहिली तर मोठ्या प्रमाणात मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतील. तसे घडणे लोकशाहीच्या पायावरील घाव ठरेल, असा इशारा ममतांनी नव्या पत्रातून दिला. बंगालमधील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्याआधी एसआयआर प्रक्रिया हाती घेण्यात आल्याने त्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्या प्रक्रियेवर ममता आणि त्यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस पक्षाने प्रारंभापासून आक्षेप घेतला आहे. त्या पक्षाकडून सातत्याने केंद्रीय निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.