मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आटोपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे लागल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले असून, मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष – मुंबई महापालिकेत भाजपने ८९ जागांसह मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. तर त्यांच्यासोबत युतीत असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेने २९ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीने 71 जागा जिंकत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. महापौरपदावरून रस्सीखेच सुरू – बहुमत मिळाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी आणि नेत्यांनी ‘आमचा महापौर असावा’ अशी इच्छा व्यक्त केल्याने दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पडदा टाकला आहे. आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ: देवेंद्र फडणवीस महापौरपदावरून सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महापौरपदाबाबत कोणताही वाद होणार नाही. महापौर कोण, कधी होणार आणि किती कालावधीसाठी असेल, या सर्व गोष्टी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि आमच्या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून ठरवू. आम्ही अतिशय उत्तम पद्धतीने मुंबईचा कारभार करून दाखवू.” दरम्यान, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी, सत्ता टिकवण्यासाठी मित्रपक्षाला सोबत घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता सत्तेचे हे समीकरण कसे जुळते आणि मुंबईच्या महापौरपदी कोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.