Amit Shah : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या उग्रवादाविरोधातील लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, येत्या ३१ मार्चपूर्वी नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड केला जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी रविवारी येथे व्यक्त केला. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित एका उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर ते (Amit Shah) बोलत होते. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ३१ मार्चच्या डेडलाईनच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, गृहराज्यमंत्री विजय शर्मा यांच्यासह केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Amit Shah याशिवाय नक्षलवाद प्रभावित महाराष्ट्र, ओडिसा, झारखंड आणि तेलंगणा या राज्यांचे पोलीस महासंचालक आणि सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी सारख्या निमलष्करी दलांच्या प्रमुखांनीही या चर्चेत सहभाग घेतला होता.नक्षलवाद्यांचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करणे आणि त्यांच्या शरण येण्याच्या धोरणाला प्रोत्साहन दिल्याने नक्षलवादी चळवळ आता बॅकफूटवर आली असल्याचे शाह यांनी यावेळी नमूद केले. बस्तरची ओळख बदलतेय छत्तीसगडचा बस्तर विभाग हा दीर्घकाळापासून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे ही पकड सैल झाली आहे. गेल्या वर्षभरात सुरक्षारक्षकांनी मोठी कामगिरी बजावली असून, जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत ५०० हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यामध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या ‘बसवराजू’ याच्यासारख्या जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे. याच काळात सुमारे १,९०० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून २,५०० पेक्षा जास्त जणांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले आहे. ही आकडेवारी नक्षलवादाच्या अंताची स्पष्ट साक्ष देत असून, आता हा लढा अंतिम टप्प्यात असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.