Uddhav Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला संख्याबळ मिळाल्यानंतर मुंबईतील राजकारण अधिकच रंजक व नाट्यमय झाले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी ठाकरे गटाचे दोन नगरसेवक आणि मनसेचे पाच नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर आता मुंबईतही अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भास्कर जाधव यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आवाहन करत मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. “एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसवावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात हीच खरी श्रद्धांजली ठरेल,” असे भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. भास्कर जाधव पुढे म्हणाले की, “हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षी मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर बसणार नाही, यासारखे दुःख दुसरे नाही. जे स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवतात, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. बाळासाहेबांप्रती खरी निष्ठा असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिलाच पाहिजे.” एकनाथ शिंदे यांनी भाजपला स्पष्ट सांगावे की, केंद्रात आणि राज्यात सत्तेसाठी दिलेला पाठिंबा वेगळा विषय आहे, मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे, असेही भास्कर जाधव यांनी नमूद केले. “राजकीय मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे जे उमेदवार देतील, त्याला मदत करण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवावे,” अशी साद त्यांनी घातली. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी यापूर्वीही महापौरपदाबाबत सूचक विधान करत “देवाची इच्छा असेल तर आपला महापौर बसेल,” असे म्हटले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, भाजपने महायुतीचाच महापौर होणार असल्याची भूमिका कायम ठेवली आहे. Uddhav Thackeray Vs Eknath Shinde काल मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये मुंबई आणि पुणे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. केवळ कल्याण-डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी महापौरपद राखीव झाले. त्यामुळे मुंबईत ST प्रवर्गातून महापौर होण्याची ठाकरे गटाची आशा मावळली होती. मात्र, आता भास्कर जाधव यांच्या या भावनिक आणि राजकीय आवाहनामुळे मुंबईत नवे राजकीय समीकरण आकाराला येणार का, आणि एकनाथ शिंदे खरोखरच उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.