Eknath Shinde : राज्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांत महायुतीने वर्चस्व राखले असले, तरी भाजप पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजपने स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या तुलनेत अधिक जागा जिंकत आपली संघटनात्मक ताकद अधोरेखित केली. याउलट, महायुतीतील घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालेले नाही. विशेषतः शिंदेसेना अनेक ठिकाणी भाजपवर अवलंबून असल्याचे चित्र दिसून आले. राज्यातील काही महत्त्वाच्या नगर परिषदांमध्ये आणि महापालिकांच्या अनेक प्रभागांमध्ये शिंदे गटाची कामगिरी मर्यादित राहिली. काही ठिकाणी त्यांना तडजोडीची भूमिका घेत उपमहापौर पदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे महायुतीत भाजपचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये जात असल्याची माहिती आहे. संघटन मजबूत करणे, जिल्हा व तालुका पातळीवर पदाधिकारी बदलणे आणि पक्षाची स्वतंत्र ओळख ठळक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. तसेच मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याचे संकेतही मिळत असून काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात शिंदे गट अपेक्षेप्रमाणे प्रभाव पाडू शकलेला नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव नगराध्यक्षपद हातातून गेल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका होत आहे. ज्यांनी मंत्रिपद दिले त्यांनी काढले तरी फरक पडणार नाही. पक्षाने जिथे गरज वाटेल तिथे निर्णय घ्यावा, अशी रोकठोक प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र शिंदेसेनेत खांदेबदल होणार का? या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.