BMC Election : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रभाग समिती (BMC Election) अध्यक्षपदांच्या निवडणुकीत महायुतीने (भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना) आपले वर्चस्व कायम राखले आहे. एकूण १७ प्रभाग समित्यांपैकी ११ समित्यांवर महायुतीने नियंत्रण मिळवले असून, भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने एकत्रितपणे बहुमत साधले आहे. उर्वरित सहा समित्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी) ला फक्त एक, काँग्रेसला दोन, मनसेला एक आणि एआयएमआयएमला एक अध्यक्षपद मिळाले आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC Election) निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने तब्बल ११८ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली होती. यामुळे २५ वर्षांनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पारंपरिक सत्ता संपुष्टात आली. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, कारण या समित्यांमधून महापालिकेच्या विविध विभागांचे नियंत्रण ठरते. सोमवारी (९ मार्च २०२६) अखेरच्या पाच प्रभाग समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी तीन प्रभाग समित्यांवर भाजपने विजय मिळवला. विशेषतः ‘एस’ आणि ‘टी’ प्रभाग समिती (भांडुप-मुलुंड परिसर) येथील निवडणूक अत्यंत चुरसपूर्ण आणि नाट्यमय ठरली. या समितीत महायुती आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी) कडे प्रत्येकी १०-१० नगरसेवकांचे तुल्यबळ संख्याबळ होते. अशा परिस्थितीत अध्यक्षपदासाठी मतदान झाले. BMC Election BMC Mayor Election उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी) चे उमेदवार सुरेश शिंदे यांच्याविरोधात भाजपच्या साक्षी दळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतदान प्रक्रियेदरम्यान उद्धव गटाचे दोन अनुभवी नगरसेवक सुरेश शिंदे आणि दीपमाला बढे यांनी चुकून भाजप उमेदवार साक्षी दळवी यांच्या कॉलममध्ये सही केली. या चुकीमुळे त्यांची दोन मते अवैध ठरली. परिणामी, साक्षी दळवी यांना १० मते मिळाली, तर सुरेश शिंदे यांना फक्त ८ मते मिळाली. दोन मते अवैध ठरल्याने उद्धव गटाच्या हातून अध्यक्षपद निसटले. समसमान मते (१०-१०) पडली असती, तर ईश्वरी चिठ्ठीद्वारे (लॉटरी) निर्णय होण्याची शक्यता होती, ज्यामुळे उद्धव गटाला संधी मिळू शकली असती. मात्र, या एका चुकीमुळे पक्षाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. अनुभवी नगरसेवकांनी केलेल्या या चुकीला ‘अनवधानाने’ किंवा ‘चुकीचे’ मतदान म्हणून पाहिले जात आहे. महायुतीने आता १७ पैकी ११ प्रभाग समित्यांवर आपला दबदबा कायम ठेवला असून, बीएमसीतील सत्तासंघर्षात त्यांचे प्राबल्य अधिक मजबूत झाले आहे. BMC Election