नाशिक : शेतकऱ्यांना महत्त्वाच्या कांदा पिकाच्या उत्पादनावर, त्याच्या किंमतीवर आणि व्यापाराच्या निर्णयांवर अधिक नियंत्रण मिळावे या उद्देशाने राज्य कांदा उत्पादक संघटना एक राष्ट्रीय कांदा केंद्र स्थापन करणार आहे. हे केंद्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जाईगाव येथे सुरुवातीला दोन एकर जागेवर स्थापन केले जाईल आणि भविष्यात विस्ताराला वाव असेल, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. संघटनेने सध्याची बहुस्तरीय पुरवठा साखळी कमी करून थेट विपणन प्रणाली स्थापित करण्याची योजना आखली आहे. प्रस्तावित मॉडेलनुसार, कांदा थेट शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय कांदा केंद्राला आणि त्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ग्राहकांना विकला जाईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव आणि ग्राहकांना स्थिर व परवडणाऱ्या किमती मिळणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. राष्ट्रीय कांदा केंद्र कांद्याच्या शेतीला अनिश्चित, कर्ज-आधारित व्यवसायातून स्थिर, फायदेशीर आणि शाश्वत व्यवसायात रूपांतरित करेल. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, जो शेतकऱ्यांच्या योगदानातून उभारला जाईल. दिघोळे म्हणाले, भारत जगातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादकांपैकी एक असूनही, निर्यात, आयात निर्बंध, निर्यात बंदी, नाफेड आणि बफर स्टॉकशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि किंमत नियंत्रणाचे निर्णय आतापर्यंत शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता घेतले गेले. एकदा राष्ट्रीय कांदा केंद्र स्थापन झाल्यावर असे निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या हितासाठी घेतले जातील.