मुंबई : देशाच्या राजकारणात १९ डिसेंबर रोजी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवून खळबळ उडवून देणारे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आहे. “देशाचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस त्या पदावर बसेल, मात्र ती व्यक्ती बारामती किंवा कराडमधील नसेल,” असे सूचक विधान करत चव्हाणांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. एपस्टिन फाईल्स आणि भारतीय राजकारण – एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील गाजलेल्या ‘एपस्टिन फाईल्स‘चा संदर्भ दिला. ते म्हणाले की, “एपस्टिन फाईल्सबाबत अमेरिकेत अजूनही मोठा संघर्ष सुरू आहे. या फाईल्समध्ये अनेक अल्पवयीन मुलींची नावे असून काही कागदपत्रे मुद्दाम रद्द करण्यात आली आहेत. या फाईल्समध्ये भारतीय राजकारण्यांची नावे असण्याची दाट शक्यता आहे. जर ही नावे समोर आली, तर भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. मी १९ तारखेचा जो दावा केला होता, ती एक शक्यता होती आणि आजही ती शक्यता नाकारता येत नाही.” मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या शक्यतेवर बोलताना चव्हाण म्हणाले, “मी जेव्हा मराठी पंतप्रधान म्हणालो, तेव्हा ती व्यक्ती कोण असू शकते हे सर्वांना ठाऊक आहे. पण स्पष्ट करतो की, हे पंतप्रधान बारामतीचे किंवा कराडचे नसतील. भारतीय जनता पक्षातीलच एखादी मराठी व्यक्ती या पदावर विराजमान होऊ शकते. भारताचे नवे पंतप्रधान ‘ऑन बोर्ड’ आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.” विमान वाहतूक क्षेत्रातील इंडिगो कंपनीच्या गोंधळावरही चव्हाणांनी कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, वाजपेयी सरकारच्या काळातील कायद्यानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर त्यांच्या एकूण मालमत्तेच्या १० टक्के दंड आकारण्याची तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी. अदानी समूहाने पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत इंडिगोचा हा गोंधळ उडाला आहे. या दोन्ही घटनांचा काही परस्पर संबंध आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानांमुळे आगामी काळात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात कोणते नवे वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.