Dharmendra: बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे 90 व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी निधन झाले. प्रकृती अचानक खालावल्याने आलेल्या या दुःखद बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली आहे. त्यांच्या सहकलाकार सायरा बानो यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल अतिशय हळवे विधान केले असून एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. “ते सुधारत होते… व्हेंटिलेटरवरून हटवणार होते” – सायरा बानो “मला त्यांच्या निधनाची बातमी ऐकून विश्वासच बसला नाही. ते आमच्या घरच्यांसारखे होते. अतिशय सुस्वभावी, देखणे आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व! ते व्यवस्थित बरे होत होते. डॉक्टर त्यांना व्हेंटिलेटरवरून हटवण्याची तयारी करत होते… मी काय बोलावे?” सायरा बानो आणि धर्मेंद्र यांनी ‘साजिश’, ‘पॉकेटमार’, ‘ज्वार भाटा’, ‘आदमी और इंसान’, ‘रेशम की डोरी’, ‘आई मिलन की बेला’ अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. घरी उपचार सुरू असतानाच प्रकृती बिघडली श्वसनासंबंधी त्रासानंतर काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. वैद्यकीय प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. धर्मेंद्र यांच्या मागे पत्नी प्रकाश कौर व हेमा मालिनी, मुलगा सनी देओल, बॉबी देओल आणि मुलगी विजेता, अजीता, ईशा व अहाना देओल असा परिवार आहे. अंतिम दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात कलाकारांची उपस्थिती पवन हंस स्मशानभूमीत झालेल्या अंतिम संस्कारासाठी अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सलीम खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आमिर खान, अगस्त्य नंदा यांसह अनेकांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांचे घट्ट संबंध दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यामधील मैत्री सर्वश्रुत होती. दोघांनी ‘अनोखा मिलन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. अनिल शर्मा यांच्या ‘कश्मीर’ या चित्रपटातही दोघे एकत्र पडद्यावर दिसणार होते, मात्र तो प्रकल्प पुढे सरकला नाही. खोट्या अफवांवरून कुटुंबाची नाराजी अलीकडेच धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर पसरलेल्या खोट्या बातम्यांवर त्यांच्या मुलांनी नाराजी व्यक्त करत, चुकीच्या अफवा पसरवू नयेत असे आवाहन केले होते. भारतीय सिनेमातील अमर व्यक्तिमत्त्व ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘ड्रीम गर्ल’, ‘धरम वीर’, ‘मेरा गाव मेरा देश’ यांसारख्या अनेक उल्लेखनीय चित्रपटांमुळे धर्मेंद्र यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत सदैव अमर राहील.