Devdas: हिंदी चित्रपटसृष्टीतील भव्य आणि अजरामर चित्रपटांपैकी एक असलेला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ (2002) आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे. शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही तितकाच प्रभावी वाटतो. या चित्रपटात माधुरी दीक्षितने साकारलेली चंद्रमुखी ही भूमिका विशेष गाजली होती. अलीकडेच माधुरी दीक्षितने ‘देवदास’च्या शूटिंगदरम्यानचे अनुभव शेअर करत संजय लीला भन्साळी यांचे भरभरून कौतुक केले. माधुरी म्हणाली की भन्साळी यांच्यासोबत काम करणे म्हणजे केवळ अभिनय करणे नाही, तर संपूर्ण चित्रपट प्रक्रियेला कवितेचं रूप देण्यासारखं आहे. त्यांच्या दिग्दर्शनात प्रत्येक सीन, प्रत्येक भाव आणि प्रत्येक हालचाल अतिशय खोल अर्थ घेऊन येते. Devdas चंद्रमुखी या भूमिकेबद्दल बोलताना माधुरीने सांगितले की, ही भूमिका खूप भावनिक होती. चंद्रमुखीची कहाणी तिला संत कवयित्री मीरा बाईंची आठवण करून देते. या पात्रामध्ये एक निरागसपणा आहे. ती अशा व्यक्तीवर प्रेम करते, ज्याला हे माहीत आहे की तो तिला कधीच पूर्ण प्रेम देऊ शकणार नाही. या अपूर्ण प्रेमाची वेदना आणि उत्कटता लहान-लहान हावभावांतून दाखवण्याचं आव्हान तिच्यासमोर होतं. ‘काहे छेड़ छेड़ मोहे’ या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगताना माधुरीने सांगितले की, त्या गाण्यासाठी तिने खूप जड लहंगा घातला होता. हा लहंगा खऱ्या वेलवेटपासून बनवलेला होता आणि त्यावर अस्सल कढाई व मोत्यांचं काम होतं. त्यामुळे त्याचं वजन खूप जास्त होतं. इतकं की ती फिरणं थांबवल्यानंतरही घाघरा आपोआप फिरत राहायचा. Devdas: Madhuri Dixit संजय लीला भन्साळी यांना अनेकदा ‘टास्कमास्टर’ म्हटलं जातं, पण माधुरीचा अनुभव वेगळा होता. तिने सांगितलं की लोक त्यांना कडक समजतात, पण सेटवर ते खूप गोड स्वभावाचे होते. ते फक्त एवढंच म्हणायचे, “मला थोडंसं मॅजिक दे.” चित्रपट पाहताना भन्साळी यांच्या बारकाव्यांकडे लक्ष गेलं की वाटतं, प्रत्येक मेहनत, प्रत्येक वेदना सार्थ ठरली, असंही माधुरीने सांगितलं.