Sharad Pawar : देशात आर्थिक मंदीचा धोका? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना
Sharad Pawar : इंधन बचतीच्या नावाखाली नेत्यांनी दिखाऊपणा करू नये, त्यात सातत्य राखणे गरजेचे; पत्रकार परिषदेत शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार.

Sharad Pawar – इराण -अमेरिका युद्धामुळे भारत देशातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम होण्याचा धोका आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन व परकीय चलन बचतीबाबत केलेल्या आवाहनाची देशभर चर्चा आहे. हे आवाहन सर्वांनीच गांभार्याने घेणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून सर्वांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या काळात इंधन बचतीबाबतचा विचार सत्ताधाऱ्यांना का आला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना इंधन जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यावर भाजपच्या काही मंत्र्यांनी गाड्याचा ताफा कमी केला. काहींनी ताफाच सोडला. कोणी पायी चालतोय, कुणी दुचाकीवर जातोय, असे चित्र पाहायला मिळत आहे.
एका दिवसाच्या बचतीने फारसा फरक पडणार नाही. त्यात किती सातत्य राहील, हे महत्वाचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनावर नेते, मंत्र्यांनी केवळ दिखाऊपणा करून चालणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला. इंधन बचतीबाबत निवडणुकांच्या कालावधीत सत्ताधाऱ्यांनी जनतेत जनजागृती करायचा हवी होती. मात्र, प्रत्यक्षात तसे का झाले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान संसदेत विश्वासदर्शक किंवा अविश्वास ठराव वगळता फारसे उपस्थित राहात नाहीत.
सर्वपक्षीय बैठकांनाही ते उपस्थित राहात नाहीत, अशी टीका करून देशाच्या प्रमुखांनी सातत्याने संसदेत उपस्थित राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वापरलेली भाषा अयोग्य आहे. विरोधी पक्षनेते हे घटनात्मक आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल टिंगलटवाळी करणे योग्य नाही, असेही पवार यांनी नमूद केले. रुपयाची घसरण का होतेय, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
सोन्याच्या खरेदीवर थेट आक्षेप नाही. मात्र, अनावश्यक खर्च कमी करण्यावर सर्वांनीच भर दिला पाहिजे. देशातील परिस्थिती गंभीर असल्याने सर्वांनी जबाबदारीने वागावे लागेल. आर्थिक मंदी येऊ नये, यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून माझ्या ताफ्यात फक्त तीनच गाड्या आहेत. स्वतःला बुलेटप्रूफ गाडी दिली होती. मात्र, ती नाकारून स्वतःची गाडी वापरत असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.
ताफ्यात बदल करण्याची विनंती विशेष सुरक्षा विभागाकडे करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही राज्यांतील निवडणुकांचे निकाल अपेक्षेपेक्षा वेगळे लागल्याचे सांगून नवीन पक्षांना काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे इंडिया आघाडी काही ठिकाणी नाराजी आहे. मात्र, ती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.






