प्रभात वृत्तसेवा पुणे – मराठवाड्यातून येणाऱ्या अनेक गाड्या पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावरच टर्मिनेट करण्याचा निर्णय पुणे विभागाच्या मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवसह सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा प्रवासी आंदोलन करतील, असा इशारा प्रवाशी संघटनेकडून देण्यात आला आहे. माजी केंद्रीय रेत्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेड-पुणे नियमित एक्स्प्रेस हडपसरहून पुणे जंक्शनपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुणे विभागाच्या नवीन प्रस्तावानुसार रेल्वे बोर्डाने पुन्हा हा निर्णय मागे घेतला असून, येत्या २६ जानेवारीपासून मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्या हडपसरवरच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासन ‘लाइन मिळत नाही, शंटिंगची अडचण’ अशी कारणे देत असले तरी राजस्थान-गुजरात-उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या जेजुरीपर्यंत कुठेही स्टॅबल करून ठेवतात. असे असताना मराठवाड्याच्या गाड्यांसाठीच अडथळे कसे? असा प्रश्न संघटनांनी उपस्थित केला आहे. तळेगाव किंवा खडकी येथे पर्यायी व्यवस्था करू शकतो, असेही प्रवासी संघटनेने सुचविले आहे. नांदेड-पुणे एक्स्प्रेस पहाटे साडेचार वाजता हडपसर येथे पोहोचते. यावेळी परिसरात कोणतीही पीएमपी बस सेवा नाही. तर खासगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, मनपा, खराडी याठिकाणी जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होतात. तसेच वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि पुण्यात नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या शेकडो मराठवाड्यातील प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.