प्रभात वृत्तसेवा पुणे – वाहतूक कोंडी, खड्डे, बिघडणारे सिग्नल, फूटपाथवरील अतिक्रमण आणि दिवसेंदिवस वाढणारे अपघात अशी परिस्थितीत पुणेकर दिवस काढत असताना पुणे वाहतूक पोलिसांनी आता दंडवसुलीची मोहिम हाती घेतली आहे. वाहतूक व्यवस्थापनाच्या नावाखाली सुरू झालेला हा नवा अॅक्शन प्लॅन हा वाहतूक नियोजनाच्या नव्हे, तर दंड वसुलीच्या भूमिकेत गेला आहे. थेट वसुलीचे टार्गेट! पोलिस आयुक्तालयातील नव्या आदेशानुसार या अॅक्शन प्लॅनमध्ये दररोज २० ट्रिपल सीट वाहने जप्त करणे, दररोज किमान ५० न भरलेली चलने वसूल करणे, महिनाभरात तब्बल अडीचशे कोटी दंडाच्या वसुलीचे लक्ष्य आणि बेवारस वाहनांवर कोर्टातून आदेश घेऊन कारवाई कारवाई करणे आदीचा समावेश आहे. या आदेशामुळे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणारे वाहतूक पोलीस प्रचंड तणावाखाली आले आहेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहतूक नियोजन सोडून ते गटा गटाने सर्वत्र कारवाई करताना दिसत आहेत. दिवसभराचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ड्युटी संपल्यांनतरही कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. या टार्गेटेड कारवाईमुळे कार्यालय, महाविद्यालयीन वेळेत घाई गडबडीत असलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. दुसरीकडे नागरिकही वाहनांवर प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला हजारो रुपयांचा दंड स्वत:हून भरत नाहीत. अनेकदा न्यायालयाने लोक अदालतीच्या माध्यमातून नागरिकांना दंड भरण्याची सुविधा दिली आहे. आता मात्र दंड पेडिंग असलेले नागरिक आपोआपच पोलिसांच्या सापळ्यात सापडत आहेत. या संदर्भात १८ डिसेंबरला पोलीस आयुक्तालयात एक बैठक होणार आहे. या बैठकीत कारवाईचा आढावा घेतला जाणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा दंड वसुली मोहीम सुरू ठेवायची का? वाहतूक सुधारण्यासंदर्भात काही पाऊले उचलायची, हे ठरवले जाणार आहे. दंड बंधनकारक शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. कुठे सिग्नल बंद आहेत, पण ई-चलान हमखास येते, कुठे फूटपाथ अस्तित्वात नाही, पण पार्किंग दंड मात्र लागू होतो. पुण्यात वाहन चालवणे अवघड नाही पण दंड टाळून वाहन चालवणे अवघड आहे अशी म्हण आता प्रचलित होत आहे. या सुविधा महापालिकेने देणे आवश्यक आहे. त्याऐवजी नाहक त्रास दंड स्वरुपात नागरिकांना दिला जात आहे. कारवाई सुरू राहणार पोलिसांनी मात्र शिस्तीशिवाय शहर चालत नाही अशी भूमिका घेत नियम मोडणाऱ्यांवर ही कारवाई सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे नागरिकही नियम, शिस्त पाळण्यास तयार नाहीत. नियम मोडल्यावर दंडाचा मेसेज आला तर मात्र त्यांना राग येतो. पुणे शहरातील वाहतूक कोंडीला रस्त्याच्या दुरावस्थेबरोबरच नागरिकांची बेशिस्तही तितकीच कारणीभूत आहे.