Pune News – छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने काँग्रेस भवन केलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलीस ठाणे गाठले आणि एकमेकांविरोधात तक्रार दिली. तत्पूर्वी फरासखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन केले आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दगडफेकीचा प्रकार झाल्यानंतर काँग्रेसभवन समोर पोलिसांनी आंदोलकांना पांगवले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या गेटच्या बाहेर पोलिसांनी येऊ दिले. त्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट फरासखाना पोलीस ठाणे गाठले आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू केले. जब जब भाजप डरती है पुलीस को आगे करती है, असे म्हणत भाजप विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आणि पोलीस ठाण्याच्या दारातच बसून राहिले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. धीरज घाटे म्हणाले…. काल आम्ही सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आज जे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ करत होतो, त्याची आम्ही पोलिसांकडून रीतसर परवानगी घेतली होती. आज भाजपचे आंदोलन होत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले. ते का जमले, याचे व्हिडिओ मी दिले आहेत. काँग्रेस भवनमध्ये त्यांचे कार्यकर्ते लाठ्या काठ्या जमवत आहेत, दगडफेक करत आहेत, असा व्हिडिओ समोर आला आहे. आजच्या आंदोलनाला त्यांना गालबोट लावायचे होते. धीरज घाटे -अरविंद शिंदे – काल ज्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली, आज आम्ही महाराजांच्या सन्मानार्थ जमलो होतो. मग काँग्रेस कार्यकर्ते हे टिपू सुलतानच्या सन्मानार्थ जमले होते का, असा सवाल यानिमित्ताने मी करत आहे. पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. दगडफेकीची चौकशी करा, अशी मागणी केली आहे, तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या काँग्रेस भवनमध्ये का जमवल्या. हे स्वत:ला अहिंसेचे पुजारी म्हणवतात मग यांनी लाठ्या काठ्या आणि दगडफेक करायची का, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. अरविंद शिंदे म्हणाले…. पोलिसांनी आंदोलन १०० मीटर दूर करण्यासाठी परवानगी द्यायला हवी होते. आता भाजप कार्यकर्त्यांची ही तिसरी वेळ आहे, की काँग्रेस भवनाच्या वास्तूवर चाल करून आले आहेत. भिंतीवर चढणे वगैरे प्रकार आधी केले होते; परंतु या वेळी दगडफेक केली आहे. महापौर स्वत: या आंदोलनात सहभागी होतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. संविधानिक पद असताना महापौर कसे काय या आंदोलनात येतात? त्या शहराच्या महापौर आहेत. प्रक्षोभक भाषण करतात त्यांच्या चिथावणीवरून दगडफेक होते. अशा प्रकारे कोणी कोणाच्या कार्यालयावर चाल करून गेले नाही. ही आता नवीन प्रकारची संस्कृती भाजपने शिकवली आहे. पोलीस तक्रार दाखल करून घेत नव्हते, म्हणून ठिय्या आंदोलन केले. आमच्या तीन महिला पोलीस हवालदारही तुमच्यामुळे जखमी झाल्या आहेत. आम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल, असे सांगत पोलिसांनी आमच्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस खोटे गुन्हे दाखल करणार, हे आम्हाला माहीत आहे. आमच्यावर तक्रार दाखल करा; पण आमचीही तक्रार घ्या, अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यांनी तक्रार दाखल करून घेतली. सोमवारी दुपारी चार वाजता काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून, त्यात चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाईल.