पुणे: पुणे महानगर क्षेत्रात सध्या २२० महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची कामे सुरू असून या कामांसाठी राज्य सरकारने तब्बल ३२ हजार ५२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. देश-विदेशातील गुंतवणूकदार पुण्यात उद्योग उभारण्यासाठी उत्सुक आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. उद्योगांना आकर्षित करुन घेण्यासाठी आणि पुणेकरांना दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) बैठक नुकतीच झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि पुणेकरांचे शहरातील वास्तव्य आनंदी करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्राचा एकात्मिक विकास करण्याचा आदेश दिला. पुणे महानगर क्षेत्रासाठी निर्धारित कालमर्यादेत पक्का आराखडा तयार करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. पुणे महानगर क्षेत्रासाठीचा विकास आराखडा करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (मित्रा) संस्थेची चाचपणी केली जात आहे. हिंजवडी, बाणेर, बालेवाडी परिसरात आयटी, बँकिंग, फायनान्स क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. या परिसरातील माण-म्हाळुंगे टाऊनशिप प्लॅनिंग योजनेला गती देण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पुण्याचा रिंगरोड जवळपास वीस वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने या दिशेने पुढे काहीच काम केले नाही. गेल्या वीस वर्षात पुण्याच्या चहूबाजूने नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली. रिंग रोड पूर्ण करण्यास झालेल्या दिरंगाईचा फटका पुण्याच्या उपनगरांना सहन करावा लागतो आहे. अवजड वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, प्रवासाचा कालावधी वाढणे, प्रदूषण या समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रिंग रोडच्या कामास गती दिली असून या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याबाबतीत कधीही दुजाभाव केला नाही. राज्यातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. पुण्याभोवती होणाऱ्या रिंग रोडमध्ये अडीच लाख कोटी रुपयांचे मूल्य तयार करण्याची क्षमता आहे. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यानंतर पुण्याच्या विकासाचा वेग आहे त्याहून दुप्पट होणार आहे. पुणेकरांनी महापालिकेत भाजपाकडे एकहाती सत्ता दिल्यास देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाईल, याची मला खात्री आहे. -चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री