प्रभात वृत्तसेवा पुणे – उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका निवडणुकींची मतमोजणी लांबणीवर टाकण्याचा दिलेला निर्णय चुकीचा आहे.संविधानानुसार निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही कोर्टाला हस्तक्षेपाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडले. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिला असताना उच्च न्यायालयाने हा निर्णय कसा दिला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.राज्यातील पालिकांच्या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार होता. याला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली असून आता २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या निर्णयावर आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अॅड.अरविंद तायडे उपस्थित होते.राजकीय पक्षांनी तुरुंगात जाण्याची भीती बाळगू नये, असे आवाहन करत ते म्हमाले, निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगाला आहे. २१ डिसेंबरच्या मतमोजणीला काहीच महत्त्व राहिलेले नाही. चिन्ह वाटपाबाबत जिल्हा स्तरावरील न्यायालयाला सुनावणीचा अधिकार आहे. तो अधिकार उच्च न्यायालयाला नाही. निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम पुढे ढकलल्यामुळे नव्याने होणारी निवडणूक प्रक्रिया आणि जुन्या प्रक्रियेतील गॅझेट प्रसिद्धीचे एकत्रीकरण कसे होणार याबाबत घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होत आहे. या प्रकरणात निवडणुक आयोगाने स्वतः न्यायालयात जाऊन रद्द झालेली मतमोजणी तात्काळ पुन्हा सुरू करावी. मुख्य न्यायमूर्तींनी लक्ष घालून थांबवलेली मतमोजणी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.