प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची मुदत उलटूनही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसतील जागांचा गोंधळ संपता संपेना. अर्ज मागे घेण्यासंबंधी उमेदवारांना फोन केल्यानंतर त्यांनी नेत्यांनाच शिव्यांची लाखोली वाहिली. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या नाकीनऊ आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ४३ उमेदवार उभे केले आहेत. परंतु, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची आघाडी झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार एकमेकांची चिन्ह घेऊन निवडणूक लढवीत आहेत. ज्या मतदार संघामध्ये एका पक्षाचे तीन उमेदवार असतील त्या ठिकाणी चौथ्या उमेदवाराने त्या पक्षाचे चिन्ह घ्यायचे, अशा प्रकारचे धोरण ठरल्यामुळे काही प्रभागांमध्ये आमचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर लढवत आहेत, चार प्रभाग संपूर्ण तुतारी, काही प्रभागात दोन तुतारी दोन घड्याळ चिन्ह आहे, असे राष्ट्रवादी काॅंंग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप राष्ट्र्वादी काॅंंगेसकडून याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आले नाही, यांच्याकडे अद्याप उमेदवारांची माघारीसाठी मनधरणीच सुरू असल्याचे समजते. दोन उमेदवार गायब… हडपसर येथे एबी फाॅर्म दिलेल्या दोन उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. मात्र, हे उमेदवार गुरूवारपासून गायब झाले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत दोन वाजेपर्यंत होती. आपल्याला अर्ज मागे घ्यायला लावणार याची त्यांना कुणकुण लागली आणि ते गायब झाले. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ वैतागले. मात्र, त्यांना प्रचारासाठी तरी मैदानात उतरावेच लागणार असल्याने आता पक्ष त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. “दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना एकाच प्रभागातून अर्ज दिला होता. पण, आता ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याला तिथे संधी दिली जाणार आहे, असा निर्णय दोन्ही पक्षाच्या एकत्रित बैठकीत घेण्यात येईल. यासाठी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी जेथे अर्ज भरले आहेत त्यावर चर्चा होईल.” – सुनील टिंगरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जागा लढवणार, दोन्ही पक्षातील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सामोपचाराने तोडगा निघाला आहे.” – अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काॅंंग्रेस शरद्चंद्र पवार पक्ष