प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीत आम्ही आरोप- प्रत्यारोपांऐवजी सकारात्मक प्रचारावर भर दिला. मात्र, काही पक्षांतील उमेदवार मतदारांना पैशांचे आमिष दाखवत आहेत. याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देत दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याबाबत दोन ठिकाणी तक्रारही दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे ११९ उमेदवार स्वबळावर नशीब आजमावत आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पुणेरीपण जपत अंमली पदार्थांची तस्करी, कोयता गँगचा त्रास आणि वाढती गुन्हेगारी नष्ट करून वाहतूक कोंडीमुक्त शहर घडविण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. सध्या विरोधकांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झाल्याचे सांगत आहे. मात्र, ही योजना कधीही बंद होणार नसल्याचे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगत, या योजनेचे डिसेंबरचे पैसे खात्यात येण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीदरम्यान मोक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून, पोलिसांनी दबावाला बळी न पडता गस्त कठोर करावी. मागील निवडणुकीत पैसे वाटप झालेल्या भागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या, तरी त्यांचे उद्योग दुसऱ्या ठिकाणी सुरूच असल्याचे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले. आयोगाला आवाहन मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यावर मतदारांनी चार मते देणे बंधनकारक असल्याचे अनेक मतदारांना माहिती नाही. त्यामुळे मतदारांना मतपत्रिका देताना प्रक्रिया स्पष्ट समजावून सांगावी. जेणेकरून मतदान बाद होण्याचे प्रमाण कमी होईल, असे आवाहनही डाॅ. गोऱ्हे यांनी निवडणूक आयोगाला केले आहे.