Katraj Lake : महापालिकेने शहर पूर व्यवस्थापनांतर्गत कात्रज तसेच जांभूळवाडी तलावातील गाळ काढण्याचे काम पुन्हा सुरू कले आहे. केंद्राकडून या कामासाठी साडेचार कोटींचा निधी मिळाला आहे. महापालिका प्रशासनाने हे काम जलसंपदा विभागास दिले आहे. मागील वर्षी कात्रज तलावातील गाळ अर्धवट काढून तो त्याच परिसरात ठेवण्यात आला होता. मात्र, आता तो शेतकरी तसेच मांजरी येथील व्हीएसआय संस्थेस दिला जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. मागील वर्षी कात्रज तलावातील गाळ काढण्यासाठी १ कोटींचा खर्च झाला होता.कात्रज तलावात मोठया प्रमाणात गाळ साठलेला आहे. त्यामुळे पावसाळयात आसपासच्या टेकडयांमधून आलेले पाणी या तलावाची साठवण क्षमता कमी करते. त्यामुळे तलावाचे पाणी मोठया प्रमाणावर थेट आंबील ओढा नाल्यात येते. परिणामी, नाल्याच्या परिसरात पूरस्थिती उद्भवते. त्यामुळे, महापालिकेने शहरासाठी केंद्रशासनाच्या शहरी पूर व्यवस्थापन आराखडयात तलावांमधील गाळ काढण्याचे प्रस्तावित केले आहे. त्या अंतर्गत केंद्राकडून महापालिकेस या कामासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यातून मागील वर्षी कात्रज तलावातील गाळ काढण्यात आला. मात्र, प्राणी संग्रहालयास या ठिकाणी पक्षी संग्रहलाय उभारायचे असल्याने हा गाळ बाजूला ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, त्याचा उपयोग होणार नसल्याचे आता लक्षात आल्याने हा गाळ शेतीसाठी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी, महापालिका प्रशासनाने शेतकऱ्यांनी गाळ घेवून जाण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यासाठीचा वाहतूकीचा खर्च मोठा असल्याने शेतकरी पुढे आले नाहीत. त्यामुळे आता महापालिका हा गाळ मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेस देणार आहे. त्याचा काही खर्च महापालिका तसेच संस्था करणार आहे. जांभूळवाडी तलावाचेही खोलीकरण कात्रज तलावासोबतच महापालिकेकडून जांभूळवाडी तलावाचेही खोलीकरण केले जात आहे. या तलावातील पाणी शुध्द करून पालिका ते आसपासच्या गावांना देणार आहे. त्यासाठी पालिकेने या ठिकाणी ४ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे कात्रज तलावाच्या सोबतच या तलावातील गाळही काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.