प्रभात वृत्तसेवा पुणे – नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र, सरकार, विधानसभा , विधान परिषद सभापती यांना विरोधी नेता नेमायचाच नाही. विरोधीनेता नसणे शासनाला सोयीचे वाटते, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नेते जंयत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विदर्भातल्या जनतेचे प्रश्न अधिवेशनात आवश्यक प्रमाणात मांडले जात नाही. प्रश्नांना वेळही दिला जात नाही. हिवाळी अधिवेशन दोन-तीन आठवड्यांचे असायला पाहिजे. रविवारचा एक दिवस वाढवून विदर्भावर उपकार केल्याचे दाखविले जात असल्याचे सांगून ते म्हणाले, नाशिक कुंभमेळ्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र, साधुग्रामसाठी तपोवनातील झाडे तोडण्यास नाशिककरांचा विरोध आहे. यापूर्वी कुंभमेळ्यासाठी कधी झाडे तोडली नाहीत. आता झाडे तोडून कुंभमेळा घेण्याची हौस योग्य नाही. मुख्यमंत्री राज्य दिवाळखोरीत नसल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात्र आकडेवारी समोर आली की दिवाळखोरीची सत्यता समजणार आहे. दिवाळखोरी नसल्यास ठेकेदारांना कामाची नियमित व थकीत बिले मिळायला हवी. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अद्याप शासनाने सोडविलेला नाही. आता पुढच्या निवडणुकीच्या आधीच कर्जमाफीची घोषणा होईल, असे दिसते. त्याचा निवडणुकीच्या प्रचारात वापरही केला जाईल. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी शासनाने समिती नियुक्त केली आहे. समितीचे निष्कर्ष आल्यावर बोलणे योग्य होईल.