पुणे – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरू नये, तसेच त्यांना इतर पक्षांकडून तिकीट मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने महापालिका निवडणुकीप्रमाणेच शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. 21) एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारांच्या हातात एबी फॉर्म शेवटच्या क्षणी देण्यात येणार असल्याने अधिकृत उमेदवाराशिवाय कोणीही अर्ज दाखल करू शकणार नाही, असा पक्षाचा अंदाज आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांकडून बंडखोरी टाळण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही हीच रणनीती आखण्यात आली आहे. यामुळे सर्व इच्छुकांनी आपल्यालाच पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.