प्रभात वृत्तसेवा पुणे – अजितदादा नुसते बोलतात; पण माझे काम बोलते. राज्यात एकमेकांबरोबर काम करत असताना महापालिका निवडणुकीत एकमेकांवर टीका करायची नाही, असे ठरले होते. मी बोलत नाही; परंतु अजितदादांचा संयम ढळला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहीर मुलाखतीत केली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी ही मुलाखत घेतली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.मेट्रोचा प्रवास मोफत ही घोषणा अजित पवार यांनी जाहिरनाम्यात केली. मात्र, प्रत्यक्षात तिकीट दराचा निर्णय घेणारी ‘फेअर फिक्सेशन कमिटी’ असते. त्यांना तो अधिकार आहे. मीही म्हणेन, की महिलांसाठी विमानप्रवास मोफत आहे, तर जाहीर करायला माझे काय जाते? असा प्रश्न विचारत निवडून येता येत नाही म्हणून काहीही जाहीरनामे काढतात, अशी टीका फडणवीस यांनी केली. पुण्यातील ३० टक्के बीडीपीमध्ये अतिक्रमण झाले आहे. पुण्यातील टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत, त्या टिकल्या पाहिजेत, यासाठी ‘शाश्वत विकासाचे धोरण’ केले पाहिजे. त्यासाठी एक समितीही नेमली आहे. त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यांच्या शिफारशींवर हरकती सूचना मागवून ती राबवली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. म्हणूनच पाडावे लागले उड्डाण पुलाचे काम पुण्यात उड्डाण पुलांचे काम बिनडोकपणे केले होते. म्हणूनच ते पाडण्याची वेळ आली; परंतु आता २३ उड्डाण पूल बांधणार आहोत, जे पुढील २५-३० वर्षे पाडण्याची वेळ येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. पुण्यातील रस्त्यांवर क्षमतेपेक्षा दीडपट वाहने आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाण पुलांशिवाय वाहतुकीसाठी विनाअडथळा ५४ किमीचे बोगदे करण्यात येणार आहेत. त्यासाठीचा प्लॅन तयार असून, ३२ हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च येणार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच सध्या एक हजार इलेक्ट्रिक बस आहेत आणखी चार हजार इलेक्ट्रिक बस घेणार असल्याचेही ते म्हणाले. होर्डिंग्ज लावून शहर विद्रुप करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. बहीण-भाऊ एकत्र येण्याचे क्रेडिट देतील का? भाऊ- भाऊ एकत्र येण्याचे क्रेडिट मला देतात; पण बहिण-भाऊ एकत्र आले असतील, तर त्याचे क्रेडिट मला देतील की नाही माहिती नाही, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे बंधू आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या एकत्र येण्यावरून लगावला. रुसलेल्या निष्ठावंतांना सल्ला अनेक निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज झाले आहेत, याविषयी विचारले असता, अनेकदा नाईलाजाने निष्ठावंतांपेक्षा निवडून येणाऱ्याला प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे राजकारणात संयम ठेवणे आवश्यक असते, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हेगारांना दिलेल्या तिकिटाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, की त्यांची जागा जेलमध्ये आहे. शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार आहे. फडणवीस म्हणाले…. – पुण्यात समाविष्ट झालेली गावे ‘ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर’ (जीसीसी) म्हणून विकसित होत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. – पुढच्या पाच वर्षांत ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मनपाच्या माध्यमातून करणार आहे. – सांस्कृतिक क्षेत्रासाठी ‘कल्चर ऍक्शन प्लॅन’ बनवायला हवा.